शिवडावचे पाणी अखेर गडनदीत दाखल
62060
‘शिवडाव’चे पाणी गड नदीत दाखल
कणकवलीसह लगतच्या गावांना दिलासाः शहरावरील टंचाई संकट टळले
राजेश सरकारे ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ः शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात दाखल झाल्याने कणकवली शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कणकवली शहरासह हळवल, हरकूळ, सांगवे आदी गावांच्याही नळ योजना पुन्हा कार्यान्वित झाल्या आहेत.
यंदा गड नदीपात्रात उशिरा पाणी अडविण्यात आले. त्यामुळे मार्चअखेरीस बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आला होता. तेव्हा, एप्रिलपासूनच कणकवली शहर आणि तालुक्यातील अन्य गावांत पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या होत्या. कणकवली शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या कोंडीतही पाणी साठा कमी झाला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पाणी आटल्याने कणकवली शहराची नळ पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली होती. गड नदीकाठच्या हरकुळ, हळवल आदी गावांच्या नळ योजना ठप्प झाल्या होत्या.
कणकवली शहराला दररोज पंधरा लाख लिटर्स पाणी लागते. गड नदीपात्रात आठ ते दहा दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याने कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. याशिवाय, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनीही पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करून गड नदीपात्रात शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.
गड नदीपात्रात शिवडाव धरणाचे पाणी दाखल झाल्याने कनकनगर येथील बंधाऱ्यामधील प्लेट काढून हे पाणी जॅकवेल भागात आणण्यात आले. याशिवाय, कनकनगर येथील बंधाऱ्यातही या पाण्याचा साठा करण्यात आला. त्यामुळे आता पाऊस पडेपर्यंत कणकवली शहरवासीयांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे.
दरम्यान, शहरवासीयांना पाणी कमी पडू नये, यासाठी कनकनगर येथील नळ योजनेच्या जॅकवेल भागात गतवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ उपसा देखील केला आहे. त्यामुळे येथील भागात मोठा पाणी संचय झाला आहे. शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात आल्याने कणकवली शहरासह सांगवे, हरकुळ, हळवल आदी नदीकाठच्या गावांच्याही नळ योजना पुन्हा कार्यान्वित झाल्या आहेत.
चौकट
जानवली नदीकाठच्या गावांना पावसाची प्रतीक्षा
शहरालगतच्या जानवली नदीपात्रात मात्र बंधारे घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जानवली नदीकाठच्या साकेडी, नागवे, करंजे, कोंडये आदी गावच्या नळ योजना प्रभावित झाल्या आहेत. प्रतिवर्षी येथे पाणी टंचाई होत असल्याने जानवली परिसरातील ऊस शेतीही बंद करण्यात आली आहे. जानवली नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईतून सुटका होण्यासाठी पावसाची प्रतीक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.