घर शाकारणी व्यवसाय झाला दुर्मिळ

घर शाकारणी व्यवसाय झाला दुर्मिळ

Published on

swt621.jpg
62138
म्हापणः घर शाकारणी करतानाचे संग्रहीत छायाचित्र.

घर शाकारणी व्यवसाय झाला दुर्मिळ
स्लॅबच्या घरांचा परिणामः ग्रामीण भागात कौलारु घरेही दिसेनात
संदिप चव्हाणः सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ६ः वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चित्र गेल्या काही वर्षांपासून बदलत चालले आहे. सध्या ग्रामीण भागातील कौलारु घरेही यामुळे दिसेनाशी झाली असून स्लॅबची घरे उभी राहत आहेत. ग्रामीण भागात या वाढत्या स्लॅबच्या जंगलामुळे घर शाकारणी व्यवसाय धोक्यात आला आहे.
शहराप्रमाणेच आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्लॅबचे घरे, बंगल्यांमध्ये वाढ होत आहे. यामुळे कौलारु घरेही दिसेनाशी झाली आहेत.
खेड्यांमध्ये पूर्वीच्या काळी मातीची कौलारू घरे बांधली जात असत. यामुळे घरात उन्हाळ्याच्या दिवसातही थंडावा कायम असायचा. परंतु, छप्पर लावणीच्या विशिष्ट रचनेमुळे पावसाळ्यापूर्वी न चुकता या घरांची शाकारणी करावी लागत असे; अन्यथा पावसाच्या पाण्याने छपराच्या लाकडी रिपा कुजण्याची शक्यता होती. त्यामुळे पावसाळ्याआधी संपूर्ण नळे खाली उतरून खराब लाकूड सामान बदलून आणि घराची साफसफाई करून कौलै पुन्हा लावण्यात येत असत.
दरवर्षी ठराविक हंगामात कराव्या लागणाऱ्या घर शाकारणीच्या कामामुळे ही कला अवगत असलेल्या ग्रामस्थांसाठी हा एक रोजगारही झाला होता. त्यामुळे गावागावात घर शाकारणी करणारे काही गट तयार झाले होते. या गटात चार ते पाच कामगारांचा समावेश असायचा. गावातील प्रत्येक वाडीत किमान एक तरी असा गट असायचा. गटाच्या मोरक्याला माहिती दिल्यानंतर सूर्योदयानंतर लागलीच नळे परतणीच्या कामाला सुरुवात होत असे. सूर्योदयापासून सायंकाळपर्यत काम चालत असे किंवा घर मोठे असल्यास दोन दिवसही लागत असत.
या कामगारांचे दरही इतर कामगारांच्या मजुरी पेक्षा जास्त असत साधारणता एप्रिल ते मे अखेरपर्यंत चालणाऱ्या या कामामुळे गावातील अनेक कामगारांच्या गटांना रोजगार प्राप्त होत असे. परंतु, अलीकडच्या काळात वेगवेगळ्या डिझाईनच्या पत्र्यांमुळे आणि स्लॅबच्या घरांकडे लोकांचा कल असल्याने जुने कौल आता दुर्मिळच झाली आहे. नळ्यांप्रमाणे नळ्यांना पर्याय म्हणून तसेच दिसायलाही आकर्षक असल्याने पत्रे, प्लास्टिक, लोखंडी पत्रांचा वापराला अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे सिमेंट व प्लास्टिक पत्र्याच्या आणि स्लॅबच्या जंगलामुळे घर शाकाहारीची कामे आता जवळजवळ बंद झाली आहेत. त्यामुळे हंगामी का असेना तीन-चार महिन्यांसाठी येथील कामगारांना रोजगार मिळवून देणारा हा व्यवसाय आता बंद पडत चालला आहे.

कोट
पूर्वी एखाद्या घराची शाकारणी (मालवणी भाषेत नळे परतणे ) आठ ते दहा कामगारांच्या समूहाने काम केली जात होती. मोठ्या घराचे काम करण्यासाठी दोन दिवस लागत असत. लहान घरे एक दिवसात होत असत. मेमध्ये ही कामे चालायची. आता लोकांच्या राहणीमानात बदल होत चालला असून कौलारु घरांच्या जागी पत्र्याची, स्लॅबची घरे आली आहेत. त्यामुळे घर शाकारणी हा व्यवसाय बंदच पडला आहे.
- महादेव गावडे, ग्रामस्थ, सावंतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com