भारत देशाची ताकद जगाने पाहिली
62340
भारत देशाची ताकद जगाने पाहिली
नारायण राणे ः ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला जशास तसे उत्तर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ ः पहलगाम घटनेनंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. भारत देशाची ही ताकद आता जगानेही पाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला भारताच्या ताकदीचा अंदाज दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या कर्तबदारीचे सैन्य आणि देशाचे पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी आज येथे आपल्या भावना व्यक्त केल्या.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात देशभरातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामुळे संपूर्ण देशांमध्ये संतापाची लाट होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याची पूर्वतयारी झाली होती. आजच्या मध्यरात्री सैन्य दलाकडून जो प्रतिहल्ला करण्यात आला, त्याचे अभिनंदन करण्यासाठी आणि सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग भाजपतर्फे आज येथे ‘मोदी अभिनंदन मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले.
प्रहार भवन येथे आयोजित या मेळाव्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम भोसले, मनोज रावराणे, विक्रांत सावंत, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केली. दरम्यान, आजच्या या मेळाव्याला असलेल्या उपस्थितीवरून थोडीशी नाराजी व्यक्त करून, राणेंनी देश प्रेमाबाबत कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह निर्माण केला. भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिले अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर मांडली. देशावर संकट आल्यानंतर सर्व वाद बाजूला ठेवून, आपण एक झाले पाहिजे असे संकेत देत पुढील आदेश येईपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेसोबत राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
-----
‘भारतीय असल्याचा अभिमान’
खासदार राणे म्हणाले, ‘‘‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती पहाटे समजली. या प्रतिउत्तराने भारत देशाचा अभिमान वाटतो. आपण भारतीय आहोत, हा अभिमान आहे. हा अभिमान तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावे. गावागावात ‘भारत माता की जय’, असा नारा द्यावा. तसे वातावरण तयार करावे. देशाच्या रक्षणासाठी जसे सैनिक पुढे येतात तसे समाजाच्या रक्षणासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे. आज जगाची परिस्थिती फार बदलली आहे. रात्री झालेल्या हल्ल्याने आपल्या लक्षात येईल की, नवीन टेक्नॉलॉजी पुढे येत आहे.’’
------
‘विश्वास निर्माण करणारी कृती’
प्रभाकर सावंत म्हणाले, ‘‘भारतीयांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ही कृती होती. पहलगाम येथील हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले, त्याचे दुःख पंतप्रधान मोदींना होते. हा विषय त्यांनी गांभीर्याने घेत अखेर जशास तसे उत्तर दिले. भारताच्या बाजूने अनेक देश उभे राहिले. या राष्ट्र प्रेमाबाबत आम्हा सर्वांना अभिमान आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.