-जिल्ह्यात साडेचार महिन्यात डेंगीचे अवघे ४ रुग्णच
साडेचार महिन्यात डेंगीचे चारच रुग्णच
डॉ. संतोष यादव ः गतवर्षी २५६ रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षात जिल्ह्यात डेंगीचे २५६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आरोग्य विभागाकडून गावपातळीवर प्रभावी उपाययोजना करतानाच जनजागृतीही केली. परिणामी, यावर्षी साडेचार महिन्यात अवघे ४ रुग्णच सापडले आहेत. डेंगीचे प्रमाण कमी झाले आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी सांगितले.
राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त १६ मेपासून कीटकजन्य रोगनियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी ग्रामपातळीवर नियोजन केले आहे. कीटकजन्य रोगावर प्रतिबंध करण्यासाठी कार्यक्षेत्रातील डासांची संख्या कमी करण्याकरिता ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील परिसर स्वच्छ ठेवून डासोत्पत्ती स्थाने नष्ट केली पाहिजेत. डास उत्पत्ती होण्याच्या ठिकाणी गप्पीमासे सोडावेत. पाणी साठवणुकीची भांडी रिकामी करून कोरडी करावीत. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. गावामध्ये इकोफ्रेंडली कार्यक्रमांतर्गत सर्व शौचालयांच्या व्हेंटपाईपला व आऊटलेटला जाळी बसवावीत जेणेकरून डास तयार होणार नाहीत. परिसरातील प्लास्टिक, टायर्स, भंगार साहित्य आदी निरूपयोगी साहित्यांची वेळेत विल्हेवाट लावावी. तुंबलेली गटारे वाहती करणे आणि डबकी बुजवून ठेवावीत. या कार्यक्रमासाठी ग्रामआरोग्य पाणीपुरवठा व पोषण समिती यांचे तिमाही सभेमध्ये जनजागृतीबाबत विशेष सूचना देण्यात येऊन जनजागृती करा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत तसेच परिसरात टायर अथवा भंगार व्यावसायिकांनी स्वच्छता पाळणे तसेच पावसाचे पाणी साठू न देणे याची काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात डबक्यांमध्ये पाणी साठून तात्पुरती डासोत्पत्ती स्थाने निर्माण होतात, तिथे गप्पी मासे किंवा अळीनाशकाचा वापर करावा. संपूर्ण गावाचे सर्व्हेक्षण करून पॅराकन्टेनर यांची यादी करून ग्रामपंचायतीमार्फत त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे. गावातील शासकीय इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना, खासगी दवाखाने, एसटी डेपो, रेल्वेस्टेशन या ठिकाणाचे सर्व्हेक्षण करून डासोत्पत्ती स्थाने आहेत का, याची नियमित पडताळणी करावी असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
------
कोट
डेंगी हा विषाणूजन्य आजार असून, तो दूषित एडिस डासाची मादी चावल्याने त्याचा प्रसार होतो. डेंगीच्या नियंत्रणासाठी पाण्यातील एडिस डासाची अंडी, अळी, कोष व पूर्ण डास ही वाढ खंडित केली तरच डेंगी या आजाराचा प्रसार नियंत्रित करता येईल. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.
- डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.