सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी भात बियाण्यांसह खते उपलब्ध
सिंधुदुर्गसाठी ९३५१ क्विंटल भात बियाण्याची मागणी
खरीप हंगामः जिल्ह्यासाठी १२,२५९ टन खत निविष्ठा मंजूर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ः जिल्ह्यात ५६ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात भात पीक लागवडीचे नियोजन केले असून त्यासाठी सुधारित ८५२६.८४ क्विंटल व संकरित ८२५ क्विंटल असे एकूण ९३५१.८४ क्विंटल भात बियाणांची मागणी केली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात दर्जेदार भात बियाणे व खते उपलब्ध व्हावी. त्या दृष्टीने जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन केले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातपिक लागवड केली जाते. यावर्षी एकूण ५६,२५५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक असलेली दर्जेदार भात बियाणे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने विविध जातीची सुधारित व संकरित भाग बियाण्यांची मागणी केली आहे. त्यामध्ये सुधारित ८५२६.८४ क्विंटल तर संकरित ८२५ क्विंटल भात बियाण्यांचा समावेश आहे. गतवर्षी खरीप हंगामात ४८०० क्विंटल भात बियाण्यांची विक्री झाली होती. त्यानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना भात बियाण्याची कमतरता भासू नये, वेळेत बियाणे उपलब्ध व्हावीत, त्यासाठी कृषी विभागाने पूर्वतयारी केली आहे. मागणी करण्यात आलेल्या भात बियाण्यापैकी आतापर्यंत ३१८७ क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाले आहे.
जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या १९५५७ मेंट्रिक टन खताचीही मागणी केली असून १२,२५९ टन खत निविष्ठा मंजूर झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत २५९९.०६ मेंट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. उपलब्ध खत साठ्यामध्ये युरिया ९६७.५ टन, डीएपी १२.३० टन, एमओपी १२७.२५ टन, एनपीके संयुक्त १०९४.८१ टन, एसएसपी ३९७.२ टन खताचा समावेश आहे.
चौकट
भरारी पथके, तक्रार कक्षाची स्थापना
जिल्ह्यात पुरवठा होणारी भात बियाणे व खते दर्जेदार असावीत, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर कृषी विभागामार्फत भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पुरवठा करण्यात आलेल्या बियाणे व खातांबाबत शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तसेच बोगस खत व बियाणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कृषी निविष्ठा तक्रार कक्ष स्थापन केले आहेत.
कोट
शेतकऱ्याने २०२५-२६ या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करावी, यासाठी खते व भात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी योग्य व दर्जेदार बियाण्यांची निवड करावी तसेच अधिकृत विक्रेत्याकडूनच भात बियाणे व खतांची खरेदी करावी. कृषी निविष्ठेबाबत कोणती तक्रार असल्यास तालुका व जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या भरारी पथक तसेच तक्रार कक्षाकडे आपली तक्रार नोंद करावी. बोगस खत व बियाण्यांच्या विक्री बाबत दक्षता घ्यावी. आपली फसवणूक होणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी.
- सचिन कांबळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.