ठाकरे बंधु एकत्र येण्याचा जिल्ह्यात परिणाम कमीच

ठाकरे बंधु एकत्र येण्याचा जिल्ह्यात परिणाम कमीच

Published on

ठाकरे बंधू एकत्र; जिल्ह्यात परिणाम नाही
ठाकरे शिवसेनेची ताकद घटलेली ; मनसेच्या राजकीय मर्यादा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : वीस वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे जिल्ह्यातील राजकारणावर फारसा परिणाम होईल, अशी सध्याची राजकीय स्थिती नाही. कारण, मुळातच जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद सीमित आहे. खेड, दापोली तालुक्यात या नव्या युतीचा परिणाम जाणवेल, उर्वरित जिल्ह्यात नाही. जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व असले तरी पक्षफुटीमुळे त्यांची ताकद दुभंगली आहे. शिवसेनेचे दोन मंत्री आणि आमदार असल्यामुळे त्यांची ताकद दिसते.
मराठी माणसाच्या अस्मितेसाठी अखेर दोन ठाकरे बंधू आज एकत्र आले. मुंबईतील मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंनी मोठी गर्दी जमवली; परंतु मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या या युतीचा ज्वर असाच राहणे गरजेचे आहे तरच त्याचा परिणाम दिसेल. जिल्ह्यावर अनेक वर्षांपासून असलेले शिवसेनेचे गारूड फुटीमुळे राहिले नाही. मूळ शिवसेनेचे अनेक खंबीर आणि ताकद असलेले शिलेदार शिंदे शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हळूहळू शिंदे शिवसेनेची ताकद वाढत गेली आहे. अनेक निष्ठावंत शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आपले राजकीय जाळे पसरले आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेने पोखरून टाकल्याने ताकद कमी झाली आहे.
खेड, दापोली तालुक्यात कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यामुळे मनसेची चांगली ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर मनसेचा झेंडा होता. तेथे ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर काही प्रमाणात फरक पडू शकतो. रत्नागिरी, राजापूरमध्ये काही प्रमाणात मनसे आहे.

चौकट
जागा वाटप होऊ दे बघू...
मंत्री उदय सामंत याना या मेळाव्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारल्यानंतर ते म्हणाले, हा मेळावा राजकीय नाही, असे दोन्ही पक्षांनी जाहीर केले आहे. दोन्ही ठाकरे राजकारणासाठी एकत्र आल्याचे मला माहिती नाही. आधी मुंबई महानगरपालिकेसाठी दोन्ही पक्षात जागावाटप होऊ देत.
--
कोट...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणूस ताकदीने सक्रिय होत आहे. मुंबईबरोबर जिल्ह्याजिल्ह्यात हे चित्र दिसेल आणि आगामी महापालिका, पालिका निवडणुकीत त्याचे परिणाम नक्की दिसतील.
-प्रशांत साळुंखे, रत्नागिरी ठाकरे शिवसेना शहरप्रमुख
---
कोट...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आगामी पालिका, महापालिका निवडणुकीत नक्कीच फरक जाणवेल. मराठी माणसाला अनेक वर्षांपासून जे अपेक्षित होते ते झाले आहे. दोघे बंधू एकत्र आल्यामुळे आता एक आणि एक २ नव्हे तर ११ होतील.
-अरविंद मालाडकर, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com