जिल्हावासीयांनो, स्वयंरोजगार संधीचा लाभ घ्या

जिल्हावासीयांनो, स्वयंरोजगार संधीचा लाभ घ्या

Published on

76240

जिल्हावासीयांनो, स्वयंरोजगार संधीचा लाभ घ्या

ब्रिगेडियर सुधीर सावंत ः किर्लोस केंद्र, कृषी महाविद्यालयातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः नैसर्गिक शेती, फळ प्रक्रिया प्रशिक्षण, रोपवाटिका, कुक्कुटपालनाबाबत जिल्ह्यातील जनतेला प्रशिक्षित करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.
याबाबत माहिती देण्यासाठी आज ब्रिगेडियर सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या पत्रकार कक्षात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. विलास सावंत, शास्त्रज्ञ केशव देसाई, अब्दुल शेख आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराट व आनंद प्राप्त होण्यासाठी समृद्ध व आनंदी गाव प्रकल्पाची स्थापना केली आहे. हा प्रकल्प विविध गावात राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून या गावांमध्ये नैसर्गिक शेती, भरडधान्य लागवड अभियान व वृक्ष लागवड अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, असेही श्री. सावंत यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, युवकांना व महिलांना कृषी आधारित उद्योगांचे कौशल्य शिकवण्यासाठी आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत असून कृषी क्षेत्राचा विकास होत आहे. ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवण्यासाठी नैसर्गिक शेती, फळ प्रक्रिया, कुक्कुटपालन व रोपवाटिका व्यवस्थापन या विषयाची ३ ते ७ दिवस कालावधीची प्रशिक्षणे किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित केली जात आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना किर्लोस कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. प्रमाणपत्र धारक प्रशिक्षणार्थींना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व मुख्यमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थींचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र किर्लोसमार्फत आयोजित करण्यात येतात. या योजनेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून काम करत आहे. अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना मिळत आहे. नैसर्गिक शेती, फळ प्रक्रिया, कुक्कुटपालन व रोपवाटिका व्यवस्थापन विषयी अल्प मुदतीच्या प्रशिक्षणासाठी शेतकरी, युवक व महिलांनी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे संपर्क साधावा.’’
-----------------
...तर माकडांचा उपद्रव कमी होईल
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही २५ हजार वृक्षारोपण करणार आहोत. मात्र, ते करताना जंगली जनावरांना खाद्य जंगलातच मिळेल, याला प्राधान्य देऊ. तसेच माकडांची नसबंदी करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. त्यानुसार राज्याने त्याला मान्यता दिली. मात्र, केंद्राने मान्यता दिलेली नाही. ही मान्यता मिळाल्यास माकडांचा उपद्रव कमी होईल. याशिवाय बायोमेट्रिक पार्क तयार करण्यात येणार आहे. यामध्ये दुर्मिळ झाडे, फळ झाडे लावण्यात येणार आहेत, असेही श्री. सावंत यांनी सांगितले.
----------------
नैसर्गिक शेतीच्या अनुदानास सुरुवात
आम्ही केलेल्या नैसर्गिक शेती चळवळीला राज्य आणि केंद्राने मान्यता दिली आहे. त्यासाठी गाझियाबाद येथे नैसर्गिक शेती संशोधन केंद्र तर गुजरात येथे नैसर्गिक शेती कृषी विद्यापीठ सुरू केले आहे. शासनाने आता नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जिल्ह्यात १५० शेतकऱ्यांचे २५ गट तयार केले आहेत. ‘एक शेतकरी, एक एकर’ असे याचे सूत्र असून एका एकरसाठी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. नैसर्गिक शेतीला खर्च कमी आणि उत्पादन जास्त असते. तसेच उत्पादित मालाला मोठी मागणी असून आर्थिक लाभही दुप्पट, तिप्पट होत आहे, असेही यावेळी ब्रिगेडियर सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com