ःपावसाच्या विश्रांतीने लावणी रखडली
-ratchl१०४.jpg-
२५N७६६१९
चिपळूण ः पावसाचा जोर कमी झाल्याने उपलब्ध पाण्यावर पंपाच्या साह्याने पाणी घेत शिरगांव येथे सुरू असलेली भातलावणीची कामे.
----------
पावसाच्या विश्रांतीने लावणी रखडली
चिपळुणातील चित्र : ९० टक्के लावणी पूर्ण, पाण्यासाठी पंपाचा वापर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अंतिम टप्प्यातील भातलावणी रखडली आहे. तालुक्यात सरासरी ९० टक्के भात लागवड झाली; मात्र पावसाचा जोर ओसरल्याने गावोगावी पंपाने पाणी घेऊन भातलावणी करण्यावर शेतकऱ्यांना जोर दिला आहे. आतापर्यंत तालुक्यात ५ हजार ३३१ हेक्टरवर भातलावणी झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली.
तालुक्यात जवळपास भातलावणीसाठी १० हजार हेक्टर तर नाचणी लागवडीसाठी १ हजार हेक्टर क्षेत्र पूरक आहे; मात्र गेल्या काही वर्षात भात लागवडीचे प्रमाण कमी होत चालले आहे. पशुधनांची संख्या कमी झाली, त्याच्या जोडीला गावागावातील शेती करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने शेतीदेखील ओस पडू लागली आहे. यावर्षी मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणी रखडली होती. पुढे पावसाला चांगली सुरुवात झाल्यानंतर भातलावणीचा जोर वाढला. गेले २०-२५ दिवस सातत्याने भातलावणीत गावोगावचे शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पाणी उपलब्ध असणाऱ्या सखल भागातील भातलावणी पूर्णत्वास गेली; परंतु जेथे पाण्याची सुविधा नाही त्यांना मोठ्या पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या तीन-चार दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. भातलावणीची रोपेही तयार आहेत. त्यामुळे आहे त्या स्थितीत लावणी केली जात आहे.
तालुक्यात १० हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीयोग्य असले तरी गतवर्षी ६२०० हेक्टरवर भाताची लागवड झाली होती. अलीकडच्या काही वर्षात सरासरी ६५०० हजार हेक्टरवर भात लागवड होते. सध्या तालुक्यात १० जुलैअखेर ५३३१ हेक्टरवर भाताची लागवड झाली. नाचणीची लागवड १२५ हेक्टरवर झाली आहे. नाचणी लागवडीसाठी १ हजार हेक्टर पूरक क्षेत्र असले तरी भाताप्रमाणेच नाचणीची लागवड देखील कमी प्रमाणात होताना दिसत आहे. उपलब्ध पाण्यावर येत्या दोन-चार दिवसात भात लागवड पूर्णत्वास जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
--------
कोट
पावसाचा जोर कमी झाल्याने भातलावणीचा मोठा प्रश्न पडला आहे. डिझेल पंपाने लांबवरून पाईपद्वारे पाणी घेऊन लावणी करावी लागते. एकीकडे ट्रॅक्टरद्वारे चिखलणी, लोकांची जुळवाजुळव करून लावणी आणि पंपाच्या साह्याने दीड-दोन हजार मीटरवरून पाणी घेत कसरत करून लावणीचा उद्योग करतोय. लांबून पाणी घेतल्याने चिखलणीला तेवढे पुरेसे पाणी येत नाही; परंतु पावसाचा जोर नसल्याने आता आहे त्या स्थितीत लावणी करण्याशिवाय पर्याय नाही. साहाय्यक कृषी अधिकारी दादासाहेब खारतोड यांचे चांगले मार्गदर्शन मिळते. त्यांच्या सूचनेनुसार शेतीची कामे करत आहोत.
--विनायक शिंदे, प्रगतशील शेतकरी, शिरगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.