प्रवेश लांबल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
प्रवेश लांबल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
अकरावीची प्रवेशप्रक्रिया ; पालकांमधून नाराजी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबल्यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण विभागाच्या दिरंगाईबद्दल पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दहावीचा निकाल लागून बराच काळ लोटला तरी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आणि विज्ञान, वाणिज्य की, कला शाखा निवडायची याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रवेश निश्चित नसल्याने त्यांना अभ्यासाला सुरुवात करता येत नाही. ही अनिश्चितता आणि भविष्याची चिंता विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण निर्माण करत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा आणि माहितीच्या अभावामुळे अधिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मुलांच्या भविष्यांच्या चिंतेत पालकही हवालदिल झाले आहेत. प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांमध्ये चौकशी करण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी त्यांचा वेळ वाया जात आहे. प्रवेशाची रक्कम आणि इतर खर्चांचे आर्थिक नियोजन करणेही त्यांना कठीण झाले आहे. शिक्षणसंस्थांनीही या प्रकरणी हतबलता व्यक्त केली आहे. या लांबलेल्या प्रवेशप्रक्रियेचा विद्यार्थी आणि पालक या दोघांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रवेशप्रक्रियेतील अडथळे दूर करावेत, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू असून, त्याची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रिया ५० टक्के पूर्ण झाली आहे. त्याचे अकरावीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
ऑनलाइन प्रणालीत अडचणी
काही विद्यार्थी एकावेळी इतर अभ्यासक्रम किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीतही असातत. ११वी प्रवेशप्रक्रियेतील विलंबामुळे त्या नियोजनावर परिणाम झाला आहे तसेच प्रवेशाबाबत वारंवार बदलणारे नियम, फेरतपासणी यादी आणि ऑनलाइन प्रणालीतील अडचणी यामुळे पालक व विद्यार्थी अधिक गोंधळलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.