रत्नागिरी ः 76 प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या
जिल्हांतर्गत ७६ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या
पहिला टप्पा पूर्ण; संवर्ग ३ आणि ४ मधील बदल्यांकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः मे महिन्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया दोन महिने विलंबाने सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात संवर्ग १ मधील ७६ शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षकबदल्यांचे चार टप्पे होणार असून, संवर्ग ३ आणि ४ मधील प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्यास जुलै महिना सुरू झालेला आहे. संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षक, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या, ५३ वर्षांवरील शिक्षक यांचा समावेश आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यात ९५ इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज भरलेले होते. त्यातील पात्र ठरलेल्या ७६ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. दोन दिवसांनी संवर्ग २ म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत पात्रसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. बदल्यांची प्रक्रिया एकूण चार टप्प्यात होणार आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र ठरलेल्यांचा समावेश आहे. अवघड क्षेत्रात ३ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना यामध्ये अर्ज सादर करता येणार आहे. यासाठी २०२२ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील शाळाची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामध्ये सुमारे ९०० शाळा अवघड क्षेत्रात आहेत. संवर्ग ४ मध्ये बदलीपात्र शिक्षकांचा समावेश आहे. एकाच शाळेत ५ वर्षे आणि अवघड क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या शिक्षकांचा समावेश असतो. जिल्ह्यातील ११०० शिक्षक बदलीपात्रच्या यादीत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महिन्याचा कालावधी लागेल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जून महिन्यात पूर्ण होणारी बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन महिन्याचा विलंब होणार आहे. त्यामुळे बदल्यांची अंमलबजावणी दिवाळीच्या सुट्टीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट
राजापूर, खेड तालुक्यात सर्वाधिक पदे रिक्त
जिल्हा परिषदेच्या २३०० प्राथमिक शाळा असून, ५ हजार ७०० शिक्षक आहेत. ही प्रक्रिया राबवताना प्रत्येक तालुक्यात रिक्त पदांची सख्या समान राहावी यासाठी टक्केवारी निश्चित केली आहे. यामध्ये राजापूर आणि खेड या दोन तालुक्यात सर्वाधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अन्य तालुक्यातील शिक्षकांनी या दोन तालुक्यात जावे लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.