विनापरवाना ‘स्मार्ट मिटर’ तर आंदोलन

विनापरवाना ‘स्मार्ट मिटर’ तर आंदोलन

Published on

79254

विनापरवाना ‘स्मार्ट मिटर’ तर आंदोलन

महावितरणला इशारा; हरकुळ, भिरवंडेवासीयांसह नाईक, सावंत आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ ः हरकुळ बुद्रूक (ता.कणकवली) आणि भिरवंडे गावात नादुरुस्त असलेल्या वीजमीटरसह चालू असलेले वीज मीटर काढून त्याठिकाणी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. याविरोधात दोन्ही गावांतील वीज ग्राहकांसह माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत यांनी आज आक्रमक भूमिका घेतली. महावितरण कार्यालयाला धडक देत कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. तसेच ग्राहकांच्या परवानगीशिवाय वीज मिटर बसवले तर आंदोलनाचा इशाराही दिला.
नादुरुस्त मिटरच्या नावाखाली सरसकट स्मार्ट मीटर बसविले जात असतील तर हे खपवून घेणार नाही. जे चालू मीटर आहेत ते ग्राहकाच्या परवानगी शिवाय काढू नका. लोकांची फसवणूक करून स्मार्ट मीटर बसवू नका. फॉल्टी मीटरची यादी आपल्याला द्या, असे वैभव नाईक, सतीश सावंत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी, उपकार्यकारी अभियंता श्री.पाटील, अधिकारी मनोज निग्रे यांना ठणकावले. याप्रसंगी ठाकरे शिवसेनेचे कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, हरकुळ सरपंच बंडू ठाकूर, मंगेश सावंत, बेनी डिसोजा, अमित सावंत, मुकेश सावंत, नित्यानंद चिंदरकर, रिया म्हाडेश्वर यासंह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मार्ट वीज मीटर बसविण्यासाठी अदानी कंपनीची वेगळी टीम आहे. तरीही महावितरणचे काही अधिकारी महावितरणच्या वायरमन यांना महिन्याला १० स्मार्ट मीटर बसविण्यास सांगत आहेत. त्याबदल्यात अदानी कंपनी प्रत्येक मीटरमागे वायरमनला ७० रुपये देत आहे. ही बाब एका वायरमननेच सर्वांसमक्ष सांगितल्याने यावर संताप व्यक्त करण्यात आला. यापुढे वीज ग्राहकाला कल्पना दिल्याशिवाय स्मार्ट मीटर लावायचे नाहीत. तसा प्रकार झाल्‍यास तीव्र आंदोलन करू असे यावेळी अधिकाऱ्यांना ठणकावले.
------
...तर आता बदलता येणार नाही!
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वीपेक्षा अधिकचे बिल येत आहे. तसेच वीज बिलामध्ये जास्तीचे डिपॉझिट आकारले जात आहे. ज्याठिकाणी ७०० ते ८०० रू. बिल येत होते त्याठिकाणी आता ३५०० रू. बिल आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. दरम्‍यान, ग्राहकांना नको असलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर लावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असता आता बसविलेले स्मार्ट मीटर बदलता येणार नाहीत ते सिस्टीममध्ये लॉक झाले आहेत आणि मीटर बदलले तरी सिस्टीम स्वीकारणार नाही असे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com