महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा
‘मनसे’ची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः राष्ट्रीय महामार्गावर होत असलेली जीवितहानी आणि जेएसडब्ल्यू कंपनीमधून येणाऱ्या वाहनाकडून वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा किंवा संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे केली आहे.
गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला मुंबई-गोवा महामार्ग त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या ठेकेदारांकडून योग्य ती उपाययोजना केली जात नाही. तसेच मनमर्जी, बेपर्वाई कामगिरीमुळे रत्नागिरी तालुक्यातील व परिसरातील अनेक पादचारी, नागरिक हे हकनाक जिवास मुकले आहेत. सध्या शासन आणखी काही नवीन महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत आहे; परंतु येथील नागरिकांच्या जिवाला धोका उद्भवणार असेल तर असा विकास नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथल्या विकासात्मक कामाला विरोध नाही; परंतु तेथील सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या नावाखाली मुकावे लागत असेल तर मनसे आपल्या पद्धतीने या विरोधात संघर्ष उभा करेल. महामार्गावरील चुकीच्या कामामुळे अलीकडील काळात काही अपघात झालेले आहेत. जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीसाठी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांकडून निवळी-गणपतीपुळे राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. संबंधित पीडित व्यक्तींना वा त्यांच्या नातेवाइकांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाईही दिली जात नाही. या सर्वांची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनीही लवकरच संबंधितांची बैठक आयोजित करू, असे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना मनसे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, विभाग अध्यक्ष सोमनाथ पिलणकर, सागर मयेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.