चिपळूण-फुलांच्या सुवासात फुलले अनारी
rat18p4.jpg-
85170
चिपळूण ः अनारी गावातील तरुण मुंबईत फूलविक्रीचा व्यवसाय करतात.
------------
फुलांच्या सुवासात फुलले अनारी
२० कोटींची सुवर्णकहाणी; चार तालुक्यांत विस्ताराचे नियोजन
* मुंबई, ठाण्यात व्यवसाय
* गावाला उभारी
* ३०० ग्रामस्थ फुलांच्या व्यवसायात
* एका दुकानाची वार्षिक उलाढाल ८ लाखांची
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ः तालुक्यातील अनारी हे गाव फूलवाल्यांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावातील तरुणांना मुंबई-ठाण्यात फुलांच्या व्यवसायात भक्कम पाय रोवून बसलेल्या अनारीकरांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला मोठा आर्थिक हातभार लागतो आहे. या अर्थक्रांतीमुळे गावाला उभारी मिळाली आहे.
अनारी गावचा पारंपरिक व्यवसाय भातशेती असला, तरी गेल्या अडीचशे वर्षांपासून अनारीतील तरुणांचे उपजीविकेचे खरे साधन फुलांचा व्यवसाय बनला आहे. या व्यवसायाची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे गावातील एका ग्रामस्थाने केली होती. ज्यातून फुले मुंबई बाजारात पोहोचू लागली आणि अनारीकरांच्या मेहनतीने ही उद्योगसाखळी वाढत गेली. आजच्या घडीला मुंबईतील ताडदेव, धोबी तलाव, कुलाबा, दादर, ग्रँटरोड, नानाचौक, माहीम, माटुंगा, बोरिवली ते नालासोपारा, वसई-विरार, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, भाईंदर अशा बऱ्याच भागांत अनारीचे सुमारे ३०० हून अधिक नागरिक फुलांच्या व्यवसायात कार्यरत आहेत. गावातील जवळपास प्रत्येक कुटुंबाचा फूल उद्योगाशी थेट संबंध असून, ७० टक्क्यांहून अधिक मुंबईतील अनारीकर हे या व्यवसायाशी निगडित आहेत.
गुलाब, गुलछडी, कागडा, नेव्हाळी, जुई, मोगरा, अष्टर, गोंडा, सायली, कन्हेर, तगर, शेवंती, लिली, ऑर्चिट, अंक्युरियन, जरबेरा अशा विविध प्रकारच्या फुलांची खरेदी मुंबईतील भुलेश्वर, दादर, एल्फिन्स्टन मार्केटमधून होते. लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव, राजकीय कार्यक्रम, मंदिर सजावट ते घरगुती डेकोरेशनपर्यंत सर्वच ठिकाणी अनारीकरांची सजावट कौशल्य गाजते.
एक दुकान मालकाव्यतिरिक्त किमान चार गावकऱ्यांना रोजगार देते, अशी या व्यवसायाची ताकद आहे. सुमारे ८ लाख रुपये वार्षिक उलाढाल एका दुकानाची असून, एकूण गावाची उलाढाल १५ ते २० कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. या उद्योगात दिवसाची सुरुवात पहाटे ३ वाजता होते आणि काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहते. यातून समाधान, सन्मान आणि स्थैर्य या गावातील व्यवसाय करणाऱ्यांना मिळते. भविष्यात महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय विस्तारासोबतच गावातच फुलशेती सुरू करण्याचा विचारही सुरू आहे, ज्यामुळे कच्च्या मालासाठी बाहेरील बाजारांवरील अवलंबित्व कमी होईल.
चौकट
चिपळुणात तालुक्यातील गावांमध्ये दुकाने
हा महसूल केवळ मुंबईतच नव्हे, तर चिपळूण, पिंपळी, शिरगाव, अलोरे, खेर्डी, सावर्डे परिसरात सुरू झालेल्या नव्या दुकानांमुळे आणखी वाढत आहे. सध्या या नव्या उपक्रमातून अनारी गावातील स्थानिक ५० तरुणांना रोजगार मिळाला असून, खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी येथेही विस्ताराचे नियोजन आहे.
कोट
अनारी गावातील घरपट एक तरुण मुंबईत फूलविक्रीचा व्यवसाय करतो. कोकणातील तरुणांनी पूर्वी गिरणी कामगार म्हणून काम केले आहे, तर काही हॉटेलमध्ये काम करायचे; मात्र ज्यांना कोणतीच नोकरी मिळत नव्हती ते फूलविक्रीच्या व्यवसायात गुंतले आणि आजही त्यांची पिढी टिकून आहे.
- विजय कदम, ग्रामस्थ, अनारी
---