राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा
राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा
मसाप, कोमसापचा पुढाकार ; लेखनासाठी मर्ढेकरांच्या कवितेची पहिली ओळ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रीत्यर्थ ‘राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींना लेखनासाठी बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील पहिलीच ओळ ‘गणपत वाणी बिडी पिताना’ देण्यात आली आहे. हा पहिलाच प्रयोग आहे.
एखाद्या सर्वज्ञात कविच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यःस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे या संकल्पनेचे स्पर्धा स्वरूप आहे. ‘गणपत वाणी बिडी पिताना’ ही ओळ स्पर्धेसाठी सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कवितेत किमान एकदा तरी येणे अपेक्षित आहे. काव्यलेखन स्पर्धकाने कवितेच्या सुरुवातीला ही ओळ वापरणे अधिक कसदार मानण्यात येईल. या ओळीशिवाय या कवितेमधील इतर दुसऱ्या कोणत्याही ओळीवर किंवा मर्ढेकरांच्या इतर कवितेवर किंवा इतर कवीच्या कोणत्याची कवितेवर केलेले संस्करण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. नवीन तयार होणाऱ्या कवितेतील अभिव्यक्ती मूळ कवितेपासून जितकी दूर जाईल तितकी ती यशाच्या अधिक जवळ जाईल, असा या संकल्पनेमागील विचार आहे. मूळ कवितेच्या ढाच्याला, आशयाला, शब्दांना आणि विषयाला या नव्या रचनेने अधिक कलासक्त वैचारिक बैठकीने कलाटणी द्यावी. वर्तमानाचे संदर्भ, नाविन्य, डौल, आशयाची घनता या गोष्टींचेही भान राखावे असा एकंदरीत विचार या स्पर्धेच्या आयोजनामागे आहे. या स्पर्धेसाठी मूळ कवितेचे विडंबन तसेच कोणत्याही अन्य प्रकारची कविता वरील मुद्द्यांच्या आधारे स्पर्धेस पात्र राहिल.
या स्पर्धेसाठीच्या कविता २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठवायच्या आहेत. या अभिनव स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त कवींनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मसाप शाखा अध्यक्ष संतोष गोनबरे आणि कोमसाप शाखा अध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी धीरज वाटेकर, दीपक मोने, प्राची जोशी यांच्याशी संपर्क साधावा.
-----
चौकट
अशी आहेत पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्यांसाठी पहिले पारितोषिक ५ हजार रूपये, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार, तसेच पाच उत्तेजनार्थ पारितोषिके ही प्रत्येकी १ हजार रुपये रोख अशी दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या प्रांतातून मान्यवर परीक्षक असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.