खैर तोडीवरील निर्बंध उठवल्याने चोऱ्यामध्ये वाढ

खैर तोडीवरील निर्बंध उठवल्याने चोऱ्यामध्ये वाढ

Published on

Rat९p९.jpg
२५N९०३५१
मंडणगड: अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जागेतील खैर तोडून चोरी करण्यात येत आहे.
----
खैरतोडीवरील निर्बंध शिथिल, चोरीत वाढ
खासगी जागेत डल्ला; थेट लाभापेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.९ ः खैरतोडीवरील निर्बंध उठल्याने त्यांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा दूरच, उलटपक्षी शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय खैरचोरीच्या घटनांमध्ये तालुक्यात वाढ झाल्याचे गेल्या महिन्यात पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या अनेक गुन्ह्यांमुळे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात आजही कोठेही खैराची शेती केली जात नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर खैरांच्या नोंदीही आढळून येत नाहीत. जिल्ह्यात नैसर्गिकरीत्या वाढलेल्या खैराची विनापरवाना तोड करण्याची परवानगीच बदललेल्या निर्णयामुळे प्राप्त झाली आहे. वनविभागाचा या प्रक्रियेवरील अंकूशही कमी झालेला दिसत आहे. अनेक प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली तरीही मालकी सिद्ध करून गाडीसह माल काही कालावधीत परत मिळत असल्याने या यंत्रणेचा अंकुशच कमी झाला आहे. खैराची लागवड व तोड या संदर्भात शासनास धोरण निश्चित करावे लागणार आहे कारण, पूर्वीचे सर्व धोरण बदललेल्या निर्णयामुळे धुळीस मिळाले आहे याशिवाय नव्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन कार्यपद्धती विकसित करण्याची गरज आहे. काही काळात स्थानिक विरुद्ध बाहेरून आलेले असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सद्यःस्थितीत व्यापारी, कामगार मात्र तेजीत आलेले दिसून येत आहेत. खैरतोडीवरील निर्बंध शिथिल झाले असले तरी वनविभागाकडून वाहतुकीचे परवाने घेणे क्रमप्राप्त आहे. असे असले तरी चोरीच्या घटनांनी तालुक्यात वाहतुकीच्या परवान्याशिवाय तोडलेल्या खैराची वाहतूक होताना दिसून येत आहे. दाखल गुन्ह्यांच्या बाबतीतही चोरांना शोधण्यासाठी पोलिस करत असलेल्या तपासास फार मोठे यश आलेले दिसून आलेले नाही. बदललेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना लाभ होण्यापेक्षा तोटाच अधिक होत असल्याने या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे.
----

कोट
चोराला शासन करणे आवश्यक आहे. या कामी पोलिसांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत वाढवून जपलेली झाडे अशाप्रकारे कोणी संधी साधून तोडून चोरून घेऊन जात असेल तर त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी; मात्र इथे शेतकऱ्यालाच ऐकून घ्यावे लागते, हा कोणता न्याय?
- महेंद्र सावंत, निवृत्त शिक्षक

कोट
खैर चोरून नेण्याने निश्चितच शेतकऱ्यांना हतबल केले आहे. त्यावर आळा घालण्यासाठी मुळापर्यंत धडक कारवाई झाली पाहिजे. खैर भरलेल्या गाड्या छुप्या पद्धतीने गावांच्या जोडरस्त्याने जात असल्याने या रस्त्यांचीदेखील वाताहत झाली आहे. यावर लगाम हवाच नाहीतर व्यावसायिक तुपाशी आणि शेतकरी उपाशी, असा प्रकार होऊ शकतो.
- विधान पवार, ग्रामस्थ
------
कोट
शासनाने खैरावरील निर्बंध जरी शिथिल केले असले तरी तोडलेल्या खैराची वाहतूक करण्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे. नसेल त्यांच्यावर कारवाई होईल. चोरीच्या घटनांचे दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत पोलिस तपास करतील.

- तौफिक मुल्ला, वनपाल मंडणगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com