''शाळा बंद'' धोरण विद्यार्थ्यांना घातक

''शाळा बंद'' धोरण विद्यार्थ्यांना घातक

Published on

swt528.jpg
15733
वायंगणी ः शासनाच्या शाळा बंदच्या धोरणाविरोधात ग्रामस्थांनी रॅली काढत संताप व्यक्त केला.

‘शाळा बंद’ धोरण विद्यार्थ्यांना घातक
वायंगणीवासीयांचा संताप; जनजागृती रॅलीतून शासनाचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ५ः पटसंख्येच्या निकषावर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी करत वायंगणी ग्रामस्थांनी शासनाच्या शिक्षक कपात धोरणाच्या विरोधात ग्रामपंचायत ते ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय या मार्गावर जनजागृती रॅली काढत संताप व्यक्त केला. त्यानंतर झालेल्या सभेत शासनाच्या निर्णयावर रोष व्यक्त करण्यात आला.
सभेचे अध्यक्षपद वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांनी भूषविले. यावेळी ज्ञानदीप संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू, संस्था खजिनदार समृद्धी आसोलकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, रसिका सावंत, शामसुंदर नाईक, संजना रेडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वायंगणकर व उदय दुखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. हडकर, संस्था सचिव वैभव जॊशी, रावजी सावंत यांनी शिक्षक कपात धोरणावर कडाडून टीका केली. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, वस्तीची विरळता व ग्रामीण वास्तव लक्षात घेता केवळ पटसंख्येच्या निकषावर शिक्षक कपात करणे अन्यायकारक असून, या निकषाचा या भागाला थेट अंमल लागू होत नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी सभेत मांडण्यात आली. शिक्षक कपात धोरणामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांवर गंभीर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याची ठोस भूमिका मांडण्यात आली.
सभेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी मान्य करण्यात आली. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासन दरबारी मान्यता मिळावी, असा ठराव सभेदरम्यान पारित करण्यात आला. बदलत्या शैक्षणिक गरजांचा विचार करता ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम करण्यासाठी सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम अत्यावश्यक असल्याचे मत पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केले. वायंगणी ग्रामपंचायत, ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समितीने सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याकरिता ज्ञानदीप संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिले. जनजागृती रॅली शांततामय मार्गाने पार पडली. विद्यार्थ्यांचे हित, दर्जेदार शिक्षण व ग्रामीण शाळांचे अस्तित्व टिकवणे हाच या आंदोलनाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या आंदोलनाचे आयोजन ग्रामपंचायत वायंगणी ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समिती व ज्ञानदीप संस्था, वायंगणी यांच्यावतीने करण्यात आले.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com