रत्नागिरी ः रावारी गावच्या प्रसाद दीक्षितांची जागतिकस्तरावर भरारी
rat9p9.jpg-
16530
रत्नागिरी ः तालुक्यातील गोळपकट्टा येथे प्रसाद दीक्षित यांची मुलाखत घेताना अविनाश काळे.
रावारी गावच्या प्रसाद दीक्षितांची जागतिक स्तरावर भरारी
गोळपकट्टा मुलाखत; इलेक्ट्रिकल डिझाईन व थर्मल तंत्रज्ञान परदेशात
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ९ ः कोणतेही काम आले की, ''हो करतो'' म्हणायचे, ते येत नसेल तर शिकायचे आणि सचोटीने पूर्ण करायचे, याच धर्तीवर काम करत लांजा तालुक्यातील रावारी गावच्या प्रसाद दीक्षित यांनी रत्नागिरीतच नव्हे तर परदेशातही व्यावसायिक भरारी घेतली आहे. त्यांचे इलेक्ट्रिकल डिझाईन आणि थर्मल तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प ओरिसा, छत्तीसगड, आसाम या राज्यांसह श्रीलंका, भुतान, दुबई आणि केनिया अशा अनेक देशांतही राबवले गेले आहेत.
गोळपकट्टाच्या ७४व्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना त्यांनी आपल्या संघर्षाच्या आणि यशाच्या आठवणींना उजाळा दिला. ते मुळचे रावारी (ता. लांजा) येथील असून, सध्या ते रत्नागिरीत स्थायिक आहेत. सोलर, सीसीटीव्ही, इलेक्ट्रिकल, संगणे अशा अनेक क्षेत्रात ते काम करत आहेत. दीक्षित यांचे बालपण रावारी येथे गेले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी रत्नागिरीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. सुरवातीला पणजी येथील आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रात नोकरीची संधी चालून आली होती; मात्र व्यवसायाची ओढ असल्याने त्यांनी ती नाकारली. त्यानंतर मुंबई आणि पुणे येथे व्यावसायिक अनुभवासाठी त्यांनी विविध कंपन्यांमध्ये नोकरी केली.
१९९२ मध्ये त्यांचा विवाह नयना (प्रेरणा) यांच्याशी झाला. दीक्षित सांगतात, ‘‘पत्नीचे नाव ''प्रेरणा'' ठेवले आणि ती खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याची प्रेरणास्रोत ठरली.’’ १९९६ मध्ये जेव्हा त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना खंबीर साथ दिली. त्यांच्या निधनानंतरही त्यांनी दिलेली ऊर्जा व्यवसायाला गती देत आहे. त्यांच्या कामाचा विस्तार परदेशातही झाला आहे. ओरिसा, छत्तीसगड, आसाम या राज्यांसह श्रीलंका, भुतान, दुबई आणि केनिया अशा अनेक देशांत त्यांनी इलेक्ट्रिकल डिझाईन आणि थर्मल तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबवले आहेत. रत्नागिरी ते मंगळूरदरम्यानच्या समुद्रातील आव्हानात्मक लाइटहाऊसचे विद्युतीकरण आणि सध्या सुरू असलेली पंतप्रधान घरगुती सोलरयोजना यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
चौकट
सामाजिक बांधिलकीचा नमुना
दीक्षित यांचा मुलगा प्रितीश हा खांद्याला खांदा लावून व्यवसायात काम करत आहे. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये त्यांनी स्वतःची शेड उभारली असून, तेथे स्थानिक तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. ‘‘पैसा दुय्यम असून प्रामाणिकपणा आणि कामाचा दर्जा हीच आमची ओळख आहे,’’ असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

