आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला गती
जिल्हा परिषद शिक्षकांना दिलासा ; शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १२ ः जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रहार शिक्षक संघटनेने मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ग्रामविकास विभाग अॅक्टिव्ह मोडवर आला असून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे शिक्षकांच्या प्रलंबित आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न गंभीरतेने मांडला होता. त्याची तातडीने दखल घेत प्रधान सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा कार्यान्वित करण्यापूर्वी सर्व जिल्हा परिषदांनी शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्यावत करावे, अशा कालमर्यादेत सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामविकास विभागाकडून बदल्यांच्या प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर ३१ मेपर्यंत उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची यादी तयार करून ही सर्व पदे प्रथम आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानंतरच नव्या शिक्षक भरतीची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रात २० टक्के आणि कक्षेत न येणाऱ्या क्षेत्रात ८० टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदलीसाठी राखीव ठेवण्यात यावीत, उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी आरक्षित पदांवर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गात परावर्तित करण्यात यावीत, अशा बाबींचा समावेश आहे.
याशिवाय आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करावे, ही प्रक्रिया शिक्षक भरतीपूर्वीच पूर्ण करावी, तसेच काही जिल्ह्यांमध्ये विशिष्ट प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी ‘शून्य बिंदू नामावली’ गृहीत धरून अशा शिक्षकांना स्वगृही बदली देण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली होती. या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाने प्रक्रिया सुरू केल्याने गेल्या तीन वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
--------
कोट
गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षकांची मागणी होती. आमच्या निवेदनाची सकारात्मक दखल घेऊन ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदलीबाबत कार्यवाही सुरू केल्याने बदली प्रतीक्षेतील १२ हजारावर शिक्षकांना न्याय मिळणार असल्याचे समाधान आहे. मात्र पाठपुरावा सुरूच राहील.
- महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

