पर्यावरणासाठी दिल्ली लॉबी विरुद्ध ‘एल्गार’

पर्यावरणासाठी दिल्ली लॉबी विरुद्ध ‘एल्गार’

Published on

17167
कोलझर ः येथे ग्रामदैवत असलेल्या श्री देवी माऊलीसमोर जमीन न विकण्याची शपथ घेत दिल्ली लॉबीविरुद्ध एल्गार पुकारण्यात आला.
17168
कोलझर ः येथे सोमवारी महसूलच्या पथकाने उत्खनन झालेल्या ठिकाणी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर उपस्थित स्थानिक ग्रामस्थ.


पर्यावरणासाठी दिल्ली लॉबी विरुद्ध ‘एल्गार’

कोलझरवासीय एकवटले; इको-सेन्सिटिव्ह एरियात अवैध उत्खनन, वृक्षतोड

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १२ : इको-सेन्सिटिव्ह एरियामध्ये समाविष्ट असलेल्या कोलझर येथील पर्यावरण वाचवण्यासाठी गावाने दिल्ली लॉबीविरुद्ध एल्गार पुकारला. यासाठी सगळ्या गावाने एकत्र येत गावच्या जमिनी विकायच्या नाही आणि असा प्रयत्न करणाऱ्यांना एकजुटीने कायदेशीर मार्गाने धडा शिकवायचा निश्चय केला. यावेळी उपस्थितांत तरुणांची संख्या लक्षवेधी होती.
वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णयानुसार केंद्राने अधिसूचना काढून कोलझर हे गाव इको-सेन्सिटिव्ह एरिया म्हणून जाहीर केले आहे. येथे पर्यावरणाला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. याशिवाय येथे २०१८ पासून वृक्षतोड बंदी आदेश लागू आहे. असे असूनही गेल्या आठवड्यात काही ‘दिल्ली लॉबी’शी संबंधित लोकांनी स्थानिक जमीन मालकांना तसेच ग्रामस्थांना अंधारात ठेवून मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या ख्रिश्चनवाडीपासून पुढच्या भागात घनदाट जंगलापर्यंत अवैधरित्या खनिजयुक्त मातीचे उत्खनन केले आहे. ख्रिश्चनवाडीपासून पलीकडच्या गावातील (शिरवल) न्हयखोलपर्यंत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे आणि सुमारे १२ फूट रुंदीचे रस्तासदृश उत्खनन केले आहे. या प्रकाराने गावात खळबळ उडाली. या गावाने यापूर्वी खनिज उत्खननाचे वारे असतानाही आपल्या जमिनी दिल्या नव्हत्या. थेट झालेल्या अतिक्रमणाविरोधात लढा पुकारण्यासाठी गाव एकवटला. यासाठी रविवारी गावच्या मंदिरात बैठक झाली. यावेळी देवस्थान मानकरी, स्थानिक याबरोबरच तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी अवैधरित्या झालेल्या उत्खननाचा निषेध केला. संबंधितांनी यातून हजारो टन खनिजयुक्त माती काढून बहुसंख्य मातीसाठा येथून वाहनाद्वारे चोरून नेऊन अन्य ठिकाणी साठवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याबाबत ज्यांच्या जमिनीतून हे उत्खनन केले गेले, त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही किंवा त्यांना याबाबत कसलीही कल्पना दिली नाही. या डोंगरात जायला कोणत्याही प्रकारचा रस्ता अस्तित्वात नाही. डोंगरात रस्ता झाला तर तेथील समृद्ध पर्यावरणात मानवी हस्तक्षेप वाढेल आणि तेथील जैवविविधतेला धोका पोहोचेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. या जंगलातून पट्टेरी वाघासह अन्नसाखळीतील अनेक दुर्मीळ प्राणी, पक्षी, इतर सजीव यांचा अधिवास आहे. तो कायम राहावा, यासाठी डोंगरात जायला रस्ता न करता स्थानिक केवळ रानवाटांचा वापर करत आले आहेत. असे असूनही या गावाबाहेरील लोकांनी स्थानिकांना, जमीन मालकांना अंधारात ठेवून हे कृत्य केले आहे. या उत्खनन केलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडे होती. यातील बहुसंख्य झाडे जुनी आणि पूर्ण वाढ झालेली होती. याचा येथील जैवविविधतेबरोबरच अन्नसाखळी समृद्ध करण्यामध्ये मोठा वाटा होता. उत्खनन करताना ही झाडे तोडून मुळासकट येथून गायब केली आहेत. वृक्षतोडीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
डोंगरातील हे उत्खनन व वृक्षतोड यामुळे येथील पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. दिल्ली लॉबीशी संबंधित काहींनी येथील जमीन खरेदीचे व्यवहार सुरू केले आहेत. त्यांनीच हा प्रकार केल्याचा संशय यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. असेच प्रकार सुरू राहिल्यास जंगलात मानवी हस्तक्षेप वाढून जैवविविधता धोक्यात येण्यासह वाघाचा कॉरिडॉर संकटात सापडणार आहे. असे प्रकार आमच्या गावात खपवून घेणार नसल्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. वन विभागाने या संदर्भात पावले उचलून हे अतिक्रमण तसेच वृक्षतोड करणाऱ्यांना शोधून काढावे. त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनात्मक आणि कायदेशीर मार्गाने पावले उचलावी लागतील, असा इशाराही यावेळी दिला. यावेळी शामराव देसाई, आपा देसाई, गुरुदास देसाई, शरद देसाई, पी. पी. देसाई, दीपक देसाई, मुरारी मुंगी, सुदेश देसाई, उल्हास देसाई, महादेव देसाई, दिलीप देसाई, दौलत देसाई, राजाराम देसाई, आनंद देसाई, सत्यवान देसाई, अमर सावंत, देवेंद्र देसाई आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
...................
जमिनी न विकण्याची ग्रामदैवतासमोर प्रतिज्ञा
ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामदैवत श्री देवी माऊलीकडे श्रीफळ ठेवून पूर्वजांचा ठेवा असलेल्या गावच्या जमिनी रक्ताच्या नात्याबाहेर विकणार नाही, अशी शपथ घेतली. गावाची जैवविविधता, येथील पर्यावरण आणि त्यावर आधारीत येथील कृषी व्यवस्था अबाधित राहावी, असे साकडे घालण्याबरोबरच अशा गावहिताविरोधातील गोष्टींना पाठबळ देणाऱ्यांना कधीच साथ न देण्याचा निश्‍चय करण्यात आला.
...................
व्यवहार न करण्याची जमीन एजंटांना विनंती
परिसरात जमीन व्यवहार करणाऱ्यांना ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन गावासमोर येण्याची विनंती केली. यानुसार काल सायंकाळी पुन्हा गाव बैठक झाली. यावेळी आम्हाला गावातील हा ठेवा विकायचा नसल्याने अशा गावच्या व्यवहारात आपण पडू नये, अशी विनंती जमीन व्यवहार करणाऱ्यांना करण्यात आली. उपस्थितांनी ते मान्य केले. जवळच्या सासोली गावामध्ये जमीन व्यवहारात दोडामार्ग महसूल विभागांने भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले होते. कोलझरबाबतीत असे काही झाल्यास कायदेशीर मार्गाबरोबरच आंदोलनात्मक लढा उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
...................
महसूलच्या पथकाकडून उत्खननाची मोजमापे
ग्रामस्थांनी या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवल्याचे समजताच आज दोडामार्ग महसूल विभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी झालेल्या उत्खननाची मोजमापे तसेच इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली. यावेळीही मोठ्या संख्येने ग्रामस्थ, तरुण त्या ठिकाणी जमले. जमीन मालकांना अंधारात ठेवून हे कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. येथे आधी कोणताही रस्ता अस्तित्वात नसताना केलेली खोदाई आणि वृक्षतोड याला जबाबदार असणाऱ्यांना शोधून काढा, अशी मागणी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com