रत्नागिरी ः अवयवदानावर भाष्य करणारे नाटक ''निब्बाण
rat22p6.jpg-
26336
रत्नागिरी : सविता नाट्य निर्मित कलामंच संस्थेने सादर केलेल्या निब्बाण या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ : सकाळ छायाचित्रसेवा )
----
अवयवदानावर भाष्य करणारे नाटक ‘निब्बाण’
सविता नाटय कलामंच; कलाकारांच्या अभिनयाला दाद
नरेश पांचाळ : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : मानवी जीवनातील लोभ, मोह आणि स्वार्थ यांवरील संघर्षातून नैतिकतेचा मार्ग दाखविणाऱ्या आणि अवयवदानासारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या ‘निब्बाण’ या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीत झाला. राज्य नाट्य स्पर्धेत सविता नाट्य निर्मित कलामंच (कल्याण) संस्थेने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हे नाटक सादर केले.
अवयवदानाची निकड आणि त्याविषयीची सामाजिक जागरूकता हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. मानवी जीवनात येणारे कठीण प्रसंग आणि त्यावेळी अंतःकरणाचा आवाज ऐकून योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आले. अवयवदानातील कायदा, नैतिकता आणि मानवी संवेदना यांचा संघर्ष लेखक-दिग्दर्शक दिनेश जाधव यांनी संहितेच्या माध्यमातून अत्यंत बारकाव्याने उलगडला. या नाटकाची निर्मिती नरेंद्र पवार यांनी केली आहे.
काय आहे नाटक ?
निब्बाण या नाटकाची सुरुवात रुग्णालयातील प्रसंगाने होते. मेडिकल असिस्टंट श्री. थोरवे आणि डॉ. जोशी, डॉ. कुलकर्णी यांच्यात शस्त्रक्रिया, रक्तगट आणि अवयवदान याविषयी चर्चा सुरू असते. याच दरम्यान आदित्य पटवर्धन उपचारासाठी दाखल होतात. ते नामवंत बिल्डर असून, त्यांच्या लिव्हरच्या आजारामुळे त्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते आणि प्रतीक्षा यादीत त्यांचा क्रमांक सहावा असतो. ते डॉक्टरांना वारंवार विचारतात की, प्रत्यारोपण लवकर होऊ शकते का?
दुसरीकडे, एका निवासी सोसायटीला इमारत पाडण्याची नोटीस येते. रहिवासी त्याविरोधात आंदोलन करतात आणि या आंदोलनाचे नेतृत्व विश्वजित कांबळे हा तरुण करतो. कोर्टात अपील केल्यामुळे त्याला धमक्याही येतात. अचानक ट्रकच्या धडकेत विश्वजितचा अपघात होतो आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ही माहिती डॉक्टर कुलकर्णी यांना मिळते. विश्वजित हा सामाजिक कार्य करणारा, प्रामाणिक आणि गरजू लोकांसाठी लढणारा तरुण असल्याने डॉक्टरांना ही बाब विशेष भावते. विश्वजितची आई डॉक्टरांना विनंती करते की, त्याचे अवयव एखाद्या चांगल्या, समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला द्यावेत. मात्र, कायद्यानुसार दाता आणि प्राप्तकर्ता यांची नावे गोपनीय ठेवावी लागतात. दरम्यान, प्रतीक्षा यादीतील आधीच्या रुग्णांनी मागणी रद्द केल्यामुळे पटवर्धन यांचा क्रमांक पुढे येतो. पटवर्धन डॉक्टरांना आर्थिक मदतीची ऑफर देतात; पण डॉक्टर नैतिकता आणि कायद्याचे पालन करण्यावर ठाम राहतात.
शेवटी विश्वजितच्या आईची इच्छा आणि विश्वजितच्या सामाजिक कार्याची जाणीव पटवर्धनांना होते. आत्मपरीक्षणानंतर पटवर्धन म्हणतात की, ते दात्याच्या इच्छेचा आदर करतात आणि स्वतःच अवयव प्रत्यारोपणाची मागणी मागे घेतात. डॉक्टर त्यांना समजावतात की, त्यांनी अंतःकरणाचा आवाज ऐकून योग्य निर्णय घेतला आणि हीच खरी मानवी मूल्यांची शिकवण आहे. या माध्यमातून नाटक असा संदेश देते की, मानवी जीवन विकारांनी भरलेले असले तरी काम, क्रोध, लोभ, मोह यांवर विजय मिळवून मानवतेचा मार्ग स्वीकारणे हेच खरे निब्बाण आहे.
-------
* सूत्रधार आणि साहाय
निर्माता : नरेंद्र पवार, नेपथ्य : प्रदीप पाटील, पार्श्वसंगीत : महेंद्र मांजरेकर, प्रकाश योजना : साई शिर्सेकर, रंगभूषा : शेखर खेमनाईक, वेशभूषा : सुजय पवार.
---------
* पात्र परिचय
सुहास कुलकर्णी : अजित देशमुख, आदित्य पटवर्धन : दिनेश जाधव, विश्वजित कांबळे : समाधान लोंढे, आई : तन्वी बनसोडे, थोरवे : सुजय पवार, बेवडा : रोहित भोसले, मावळा : नंदकुमार कोटकर, बायको : मिरा केदारे, बुद्ध मूर्ती : दर्शन देशमुख. इतर : प्रकाश साखरे, प्रवीण कांबळे, सचिन बच्छाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

