हरवलेली मंगल नातेवाइंकांच्या ताब्यात
‘ती’ महिला नातेवाईकांच्या स्वाधिन
माहेर संस्थेच्या प्रयत्नाला यश; आठवड्याने घरी परतली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : चार दिवसांपूर्वी हातखंबा येथील माहेर संस्थेत मंगल नावाची अनोळखी महिला दाखल झाली. तिचा पत्ता शोधून सुखरूपपणे तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे काम माहेर संस्थेने केले. याबाबत संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस मंगल निवळी ते हातखंबा महामार्गावर एकटीच भटकत होती. निनावी फोनद्वारे ही माहिती माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांना समजली. त्यांनी अनोळखी महिलेला सहारा व पुनर्वसनाची गरज ओळखून माहेर संस्था हातखंबा येथे दाखल केली. तिचा पत्ता व इतर नातेवाईकांचा शोध माहेर संस्था घेत होती. ग्रामीण पोलिस ठाण्यातही महिला मिळाल्याबाबत पत्र देण्यात आले.
समाजमाध्यमांद्वारे संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मंगल (वय ४०) नावाची महिला बेपत्ता असल्याची माहिती माहेर संस्थेत समजली. तत्काळ कांबळे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला व मंगल या अनोळखी महिलेच्या नातेवाईकांचा शोध लागला. त्या वाडीवस्तीत एकट्याच भटकत असतात; परंतु पहिल्यांदाच इतक्या लांब भटकत आल्याचे नातेवाईकांनी संस्थेला सांगितले. नातेवाईकांची खातरजमा करून मंगलला तिची आई व नातेवाईकांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आले. हरवलेली मंगल एका आठवड्याने घरी सुखरूप पोहोचली. त्यामुळे नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हरवलेली महिला परत घरी जाणे आमच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे, असे मत माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी सांगितले.‘

