आपण वेदनेपासून दूर राहू शकतो; पण.....

आपण वेदनेपासून दूर राहू शकतो; पण.....

Published on

फिजिओ संवाद.... लोगो

(१८ फेब्रुवारी पान २, फोटोसह घ्या)

आपण वेदनेपासून
दूर राहू शकतो; पण.....

आत्ताच्या काळात बहुतेक वेळ खुर्चीवर बसून राहणे, कमी चालणे, बराच वेळ स्क्रीनकडे पाहणे अशा प्रकारच्या कामांमुळे अनैसर्गिक हालचाली घडतात. बराच वेळ काही ठराविक स्नायूच काम करतात. पूर्ण शरीराची पुरेशी हालचाल होत नाही किंवा फक्त घरातली कामं नसून महिलांना त्या जोडीने बाहेरची कामेदेखील करावी लागत आहेत. त्यामुळे येणारा स्नायूंचा थकवादेखील जास्त प्रमाणात आहे.

- डॉ. पुष्कराज चांदोरकर
----
घरकाम म्हणजे व्यायाम नव्हे, यामागच्या लेखात आपण बघितलं की, आजच्या काळात भरपूर काम केलं म्हणजे माझा व्यायाम झाला, असं मानणं का चुकीचा आहे; पण पूर्वीच्या काळी कष्टाची काम करणारी लोकं अधिक तंदुरुस्त का असत? अगदी तसेच चित्र आत्ताच्या काळात का दिसत नाही? पूर्वी आजोबा दिवसभर शेतात राबायचे, आजी दिवसभर घरात कष्ट करायची; पण खूप म्हातारे होईपर्यंत त्यांना सांधेदुखी, कंबरदुखी असे त्रास अजिबात नव्हते, असे चित्र सर्रास दिसते आणि आजकाल थोड्याशा कष्टाच्या कामाने माणसाला दुखणं का बरं सुरू होत असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक पैलू उलगडून पाहायला हवेत.
पूर्वी लोक तंदुरुस्त असण्याचं पहिलं कारण म्हणजे ‘नैसर्गिक हालचाल’. पूर्वीच्या काळी लोक चालायचे, वाकायचे, उचलायचे, जमिनीवर बसायचे-उठायचे. या सगळ्या हालचाली नैसर्गिक असत. सर्व हालचालींमुळे सगळ्या सांध्यांची हालचाल टिकून राहत असे. घरातील कामंदेखील खूप कष्टाची होती. त्या कामांमध्येदेखील पूर्ण शरीराचा वापर होत असे. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे सवय. पूर्वी लहानपणापासूनच सर्व कामांची सवय केली जात असे. त्यामुळे सुरुवातीपासूनच स्नायूंची मजबुती तयार होत असे. त्यामुळे कष्टाचे काम करणे तुलनेने सोपे जात असे. नंतरच्या काळात लहानपणी लागणारी कामे कमी झाल्यामुळे त्या दिशेने स्नायू मजबूत होण्याचे प्रमाणदेखील कमी झाले. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे आहार. पूर्वी माणूस पूर्णपणे सात्विक, घरचे, सकस जेवण जेवत होता नंतर नंतर प्रक्रिया केलेले, रेडिमेड खाणे खाऊ लागल्याने आहारातून मिळणारे पोषण कमी होऊ लागले. भाकरी-भाजी, भात, वरण, फळे या सर्व नैसर्गिक गोष्टी खाल्ल्याने शरीराला आवश्यक असे सर्व पोषण मिळत असे. त्यामुळे वेदना येण्याचे प्रमाण कमी असे.
नियमित दिनचर्या हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. वेळेवर उठणे, ठरलेले काम करणे, संध्याकाळनंतर आराम करणे अशी सवय शरीराला असल्याने शरीराची झीज भरून निघण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत असे. आत्ताच्या काळात कामामध्ये खूप प्रमाणात अनियमितता असते. आराम करण्याच्या वेळा अनिश्चित असतात. धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर खूप प्रमाणात वाढला आहे. त्याचा थेट परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे शरीराचा आराम नीट न झाल्याने झीज भरून निघण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही.
यापुढचं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तणाव. पूर्वीच्या काळात आत्तासारखी जीवघेणी स्पर्धा नसल्याने शरीरावर आणि मनावर तणाव कमी होता. तणाव कमी असल्याने दुखणे कमी प्रमाणात होते. तणाव असेल तर शरीर कायम आखडलेले राहते. स्नायू घट्ट होतात. पर्यायाने दुखणे शरीरात जमा होऊन राहते.
थोडक्यात सांगायचे तर पूर्वीच्या काळातली जीवनशैली, आहार, दिनचर्या, सवयी, स्ट्रेस, आराम या सगळ्या गोष्टी संतुलित असल्याने शारीरिक कामातून शरीराची जपणूक होऊन जायची; पण बदललेल्या काळात शरीराला मजबूत करण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळात देखील संतुलित जीवनशैली, नियमित चालणे, चांगला आहार, पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम या सर्वांची सांगड घालून आपण वेदनेपासून दूर राहू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com