उन्हाळी शेतीतून चिंचघरमध्ये फुलवला कलिंगडाचा मळा
काही सुखद---लोगो
- rat२५p१.jpg-
P२६O२७०६३
चिंचघर येथील कलिंगडाच्या शेतात काढणीला आलेले कलिंगडाचे फळ दाखवताना संजय पायरे
- rat२५p३.jpg-
२६O२७०६५
फळमाशीपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी लावलेले पिंजरे
------
चिंचघरमध्ये फुलवला ‘कलिंगडाचा मळा’
संजय पायरे यांचा प्रयोग ; पाच एकरवर लागवड, उन्हाळी शेतीत पाच लाख उत्पन्नाची अपेक्षा
सिद्धेश परशेट्ये/सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : तालुक्यातील चिंचघर येथील प्रयोगशील शेतकरी संजय पायरे गेली २५ वर्षे उन्हाळी शेतीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सुरुवातीला एक-दोन वर्षे स्वतः शेती केल्यानंतर आलेल्या अनुभवातून, त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जमीन कसायला घेऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
चिंचघर गावालगत बारामाही वाहणाऱ्या नारंगी नदीच्या पाण्यावर पायरे कुटुंब उन्हाळी शेती करतात. त्यांची स्वतःची पाच एकर वडिलोपार्जित जमीन असली, तरी त्यातील काही जमीन पडीक व दोन एकर पाणथळ आहे. नारंगी नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असल्याने शेतात पाणी साचते, परिणामी पावसाळी भातशेतीतून फारसे काही हाती लागत नाही. यावर मात करण्यासाठी संजय पायरे यांनी उन्हाळी शेतीचा पर्याय निवडला आणि गेल्या २५ वर्षांच्या कष्टाने त्यांना पंचक्रोशीत एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. यावर्षी त्यांनी पाच एकर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात कलिंगडाची लागवड केली आहे. यासाठी त्यांना मशागत, मजुरी आणि औषध फवारणी असा एकूण सुमारे २ लाख ४० हजार रुपये खर्च आला आहे. मार्च महिन्यात कलिंगडाची तोडणी झाल्यानंतर, त्यातून साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. अवघ्या तीन महिन्यात सुमारे तीन लाखांचा निव्वळ नफा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पायरे यांना शेतीसाठी खेड येथील बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेने आर्थिक मदत केली. दोन लाखांचे पिक कर्ज मिळवून दिल्यामुळे उत्पादन खर्चाचा प्रश्नच उरलेला नाही. तसेच खेड तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक सागर धांडे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अनुष्का मोहfते यांच्या मार्गदर्शनामुळे लागवडीतील अडचणींवर ते मात करीत आहेत.
------
चौकट
फळमाशीसाठी पिंजऱ्याचा उपयोग
फळमाशीने डंख मारल्याने कलिंगड उत्पादनावर परिणाम होतो. याला आळा बसण्यासाठी श्री. पायरे यांनी त्यांच्या शेतात फळमाशीचे ३० पिंजरे बसवले आहेत. त्यामुळे कलिंगडाचे फळमाशीपासून संरक्षण होत आहे. त्यासाठी त्यांना ११ हजार रुपये खर्च आला आहे.
-----
कोट
बदलत्या हवामानामुळे उन्हाळी शेतीला फटका बसला आहे. शेतीतून अधिक उत्पन्न अपेक्षित होते; परंतु वातावरणातील बदलामुळे कलिंगडावर बुरशी आणि पर्णगुच्छ या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर झालेला आहे.
---संजय पायरे, शेतकरी
---
कोट २
शेतीची आवड, मेहनत व जिद्दीच्या जोरावर पायरे यांनी हा मळा फुलविला आहे. बेरोजगार युवकांना संजय यांचा उन्हाळी शेतीतील अनुभव हा प्रेरणादायी आहे. गेली २० वर्षे करीत असलेल्या या शेतीतून पंचक्रोशीतील अनेक तरुण शेतीकडे वळले आहेत. त्यांची मेहनत आणि चिकाटी बघून नदीकिनारी असलेली पडकी जमीन त्यांना विनामोबदला कसण्यासाठी दिली. त्यांचा आदर्श घेऊन गावातील अनेक तरुण शेती करीत आहेत.
---संग्राम कदम, चिंचघर

