‘वय वंदना’ योजनेसाठी मोहीम सुरू
27137
‘वय वंदना’ योजनेसाठी मोहीम सुरू
ज्येष्ठांना लाभ : जिल्हाभर १३ मार्चपर्यंत नोंदणीसाठी प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ : ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या आयुष्मान भारत ‘वय वंदना’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात विशेष अभियानाला सुरुवात झाली आहे. ही मोहीम १३ मार्चपर्यंत राबविण्यात येणार आहे.
केंद्राच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत वय वंदना’ योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनातर्फे ही विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ७० वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळवून देणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील एकूण २३,२०५ ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्मान वंदना योजनेचे कार्ड काढले आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी या मोहिमेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि पेन्शनर्स असोसिएशन यांची विशेष मदत घेण्याचे निश्चित केले आहे. या संघटनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचून त्यांना नोंदणी प्रक्रियेत सुलभता आणली जाईल.
...................
कोण असतील लाभार्थी?
वयोमर्यादा ७० वर्षे पूर्ण केलेले सर्व ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत. प्रति कुटुंब वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना ‘वय वंदना’ आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे आधीच आयुष्मान कार्ड आहे, अशा कुटुंबातील ७० वर्षांवरील वृद्धांना अतिरिक्त ५ लाखांचे ‘टॉप-अप’ कवच मिळेल.
....................
अशी होणार नोंदणी!
नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असून लाभार्थ्यांकडे केवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असल्यास ही प्रक्रिया अधिक जलद होईल. जिल्ह्यातील एकही पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आयोजित शिबिरांमध्ये जाऊन अथवा आपल्या जवळच्या सर्व शासकीय रुग्णालयांत, योजनेअंतर्गत सर्व अंगीकृत खासगी रुग्णालयांत किंवा सीएससी केंद्रांत ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

