यंदा गुढी पाडव्याला ''हापूस'' दुर्मीळ

यंदा गुढी पाडव्याला ''हापूस'' दुर्मीळ

Published on

गुढीपाडवा ‘हापूस’ आंब्याविना?
उत्पादनात घट ः पूरक व्यवसायालाही फटका बसणार
संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ : नैसर्गिक आपत्ती आणि अनियंत्रित किडरोग यामुळे जिल्ह्यातील हापूस आंबा हंगाम अडचणीत सापडल्याने यंदा नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्ताला ग्राहकांना हापूस आंबा उपलब्ध होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. हापूसच्या उत्पादन घटीचा पूरक व्यवसायसहित प्रक्रिया उद्योगांनाही थेट फटका बसण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वच प्रमुख शहरांमध्ये ‘देवगड हापूस’चे दर्शन सणाच्यावेळी होईल की नाही, याची शाश्वती देणे यावेळी अवघड आहे.
यंदा हापूसचे पीक अडचणीत सापडल्याची आंबा बागायतदारांची ओरड आहे. यासाठी बागायतदारांनी संघटितपणे शासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. सद्यस्थितीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशावेळी कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या नजरा राज्यातील मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. सरकार कोणता निर्णय घेणार, याचीही बागायतदारांना मोठी उत्सुकता आहे. हे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे हापूस आंबा उत्पादन कमी होणार असल्याने हापूस सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना उपलब्ध होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. दरवर्षी गुढीपाडवा, अक्षय तृतीया या दिवशी हापूस आंब्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते.
यावेळी पिक्या आंब्याला ग्राहकांची विशेष पसंती असते. त्यामुळे या निमित्ताने आंबा बागायतदार तसेच विक्रेते आंबा पिकवून बाजारात आणतात. या सणाला हापूस आंब्याची मोठी उलाढाल होते. शहरातील बरेच ग्राहक आमरस काढून उत्साहाने सण साजरा करतात; मात्र यंदा सणाला आंबा मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तयार होणारे आंबा पीक यंदा अडचणीत सापडल्याने बाजारात सर्वत्र हापूस दिसेल की नाही, हे सांगता येत नाही. त्यातूनही काही प्रमाणात आंबा बाजारात आला तर त्याचे दर सामान्यांना कितपत परवडतील, हाही एक प्रश्नच आहे. उत्पादन कमी झाल्यावर मागणी आणि पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण झाल्यास आपोआपच दरात वाढ होते, हा सर्वसाधारण ''ठोकताळा'' मानला जातो. यंदा स्थानिक बाजारपेठेत हापूस वेळीच येण्याचीही शक्यता कमी आहे. आंबा उत्पादन कमी होणार असल्याने सर्वच पातळीवर कमी-अधिक प्रमाणात त्याची झळ विविध क्षेत्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चौकट
अवकाळीची टांगती तलवार
नैसर्गिक असमतोलपणामुळे आधीच यंदाचे हापूस आंबा पीक धोक्यात आले असतानाच आता पुन्हा कोकण किनारपट्टीवर अवकाळी पावसाची हजेरी असल्याने असाच पाऊस आंबा क्षेत्रातील भागात झाल्यास उर्वरित हापूस आंबा पीकही समस्यांच्या विळख्यात सापडू शकते. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेचे सावट अधिक गडद होऊ शकते.
........................
चौकट
पर्यटनही कोंडीत ?
बाजारातील हापूस उलाढाल मंदावल्यास स्थानिक पर्यटन हंगामावरही त्याचा थेट परिणाम शक्य आहे. उन्हाळ्यात पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबरच येणाऱ्या पर्यटकांकडून हापूस आंबा खरेदीही होते; मात्र यंदा हापूस पर्यटकांपासूनही दूर राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पर्यटन हंगामही कोंडीत सापडू शकतो.
.......................
चौकट
यंदाचा संभाव्य आंबा हंगाम
* आंबा उत्पादन अत्यल्प आल्यास दर कडाडण्याची शक्यता
* उत्पादन घटीमुळे सामान्यांसाठी आंबा दूरच
* प्रक्रिया उद्योगासाठी कोकणातून पुरेसा आंबा मिळण्यामध्ये जाणवतील अडचणी
* छोट्या प्रक्रिया उद्योगांचे नियोजन अडचणीत
* पूरक व्यवसाय कोलमडण्याची भीती
* जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम शक्य
* बाजारातील उलाढाल मंदावल्यास सर्वच घटकांना बसेल आर्थिक झळ
* विविध वित्तीय संस्थांनाही आर्थिक सामना करावा लागण्याची शक्यता
...............................
कोट
यंदा आंबा उत्पादन खूपच कमी आहे. सद्यस्थितीत आंब्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अशावेळी गुढी पाडव्याच्या मुहूर्ताला ग्राहकांना आंबा चाखायला मिळेल याची खात्री नाही. पुढे वातावरण ठीक राहिल्यास अक्षय तृतीयेच्या दरम्यान हंगामातील आंबा ग्राहकांना मिळू शकेल.
- श्रीकांत नाईकधुरे, आंबा बागायतदार, बापर्डे (ता. देवगड)
............................

Marathi News Esakal
www.esakal.com