सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे भाजपचे षडयंत्र
- rat३p६.jpg-
२६O२८१९४
रमेश चेन्नीथला
भाजपचे विभाजनाचे राजकारण हाणून पाडा
रमेश चेन्नीथला ः काँग्रेस मजबूत करण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः काँग्रेस पक्षाने देशात सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे. पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात जातीय वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.
कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. चिपळूण येथे झालेल्या या कार्यशाळेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, माजी आमदार मोकल, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड गणेश पाटील, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, रत्नागिरी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, प्रदेश उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस गुरबिंदर सिंग बच्छर, शशांक बावचकर, ॲड. श्रद्धा ठाकूर, रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिपळूणमधील शिबिराच्या सांगता कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना प्रभारी रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, निवडणुकीत जय पराजय होत असतात, पराभवाने खचून न जाता काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्या. तालुका, जिल्हा, ब्लॉक, वार्ड, बूथ स्तरावर संघटना मजबूत करा व आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हात मजबूत करा. काँग्रेसचा शिपाई म्हणून लढा, काँग्रेस पक्षाला नक्की गतवैभव प्राप्त होतील, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
-----
चौकट
तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन
शिबिरानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, चिपळूणमधील शिबिरातून नेतृत्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. या शिबिराने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल. आघाडीचे राजकारण ही अपरिहार्यता आहे. पण त्याचा कोकणात काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे. आगामी काळात कोकणात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच अनुषंगाने कोकण विभागात हे तीन दिवसाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल.

