लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज तातडीने मार्गी लावा

लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज तातडीने मार्गी लावा

Published on

प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा
मनुज जिंदल ः लोकशाही दिनात निर्देश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : ‘लोकशाही दिनानिमित्त प्राप्त होणारे प्रलंबित अर्ज लवकरात लवकर निकाली काढावेत. तसेच शासकीय कार्यालयात कामासाठी येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला व सामान्य जनतेला सन्मानाची वागणूक देऊन त्यांची कामे विनाविलंब पूर्ण करा,’ असे कडक निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ पार पडला, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जिंदल यांनी यावेळी मागील लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. नव्याने दाखल झालेल्या अर्जांवर संबंधित विभागाने आतापर्यंत काय कार्यवाही केली, याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तक्रारदारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, असे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केले की, ‘कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.’
आजच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित एकूण सहा नवीन अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये तहसीलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन कार्यालयाचा समावेश आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बिरादार यांच्यासह विविध विभागांचे जिल्हाप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण विहित वेळेत करावे, जेणेकरून नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भर दिला.

Marathi News Esakal
www.esakal.com