वाणीआळीत त्या विहिरीवर संरक्षक कठडा उभारणार
‘त्या’ विहिरीवर संरक्षक कठडा उभारणार
वाणीआळीत दुर्घटनेनंतर, सुरक्षेची उपाययोजना सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : शहरातील वाणीआळी येथे एका वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर विहीर मालकाने तातडीने संरक्षणाची उपाययोजना सुरू केली असून, त्या विहिरीला पक्का कठडा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील वाणीआळी परिसरात शुक्रवारी (ता. २०) पहाटे फुले काढण्यासाठी गेले असताना विहिरीत पडून एका ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतीश नारायण जाधव (रा. वाणीआळी, चिपळूण) असे मृताचे नाव असून, ते पोस्ट विभागातून सेवानिवृत्त झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाणीआळीतील राजन आवले यांच्या घराच्या पाठीमागे ही खासगी मालकीची विहीर आहे. ५० वर्षांहून अधिक जुनी असलेल्या या विहिरीचा वापर आजही केला जातो. त्या विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने आणि अंधारामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे ३० वर्षांपूर्वीची एक जुनी आठवण पुन्हा ताजी झाली. याच विहिरीत एक विवाहिता पाणी काढताना पाय घसरून पडली होती. सुदैवाने, तिने विहिरीतील पाईप आणि दोरी पकडून ठेवल्यामुळे ती बचावली होती; मात्र, शुक्रवारी झालेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. त्या विहिरीलगतच नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी ‘पाखाडी’ (रस्ता) असल्याने ही विहीर अत्यंत धोकादायक बनली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत विहीर मालकांनी तातडीने उपाययोजना म्हणून विहिरीच्या सभोवताली लोखंडी पत्रे लावले आहेत. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी लवकरच विहिरीला पक्का संरक्षक कठडा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

