चिपळूण-पटसंख्येसाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात

चिपळूण-पटसंख्येसाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात
Published on

पटसंख्येसाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात
चिपळूण तालुका; मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : वाढते शहरीकरण आणि इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढलेला ओढा यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि खासगी मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शाळेचा पट वाढावा, आहेत ते विद्यार्थी टिकून राहावेत आणि शाळेची तुकडी बंद पडू नये, यासाठी चिपळूण तालुक्यातील ३१६ जिल्हा परिषद शाळांसह अन्य शिक्षणसंस्थांचे शिक्षकही सध्या कडक उन्हात विद्यार्थ्यांच्या शोधात ''डोर टू डोर'' भेटी देत आहेत.
तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांची अवस्था अधिकच बिकट आहे. मालदोली येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ पाच विद्यार्थी असून, तिथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. पोफळी-धनगरवाडी येथील शाळेत अवघ्या दोन विद्यार्थ्यांवर शाळा सुरू आहे. अशा प्रकारे एकअंकी विद्यार्थीसंख्या असलेल्या तालुक्यातील सुमारे ३५ शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नोकरी वाचवण्यासाठी आता नर्सरीपासून ते माध्यमिकपर्यंतचे शिक्षक हातात शाळेची माहितीपत्रके घेऊन थेट पालकांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत.
विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळांनी गावागावांत आकर्षक फ्लेक्स लावले आहेत. यामध्ये मोफत प्रवेश, डिजिटल वर्गखोल्या, वैयक्तिक लक्ष आणि विविध उपक्रमांची माहिती दिली जात आहे. अनेक शिक्षकांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसचा वापर करून प्रवेशाचे आवाहन केले असून, चौथीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे.
काही खासगी शिक्षणसंस्थांनी आपल्या शिक्षकांना नोकरी वाचवायची असेल तर विद्यार्थी आणा, अशा कडक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या पायाला भिंगरी बांधली असून, नजीकच्या गावांमध्ये जाऊन घरभेटी देण्याचे सत्र सुरू केले आहे. प्रस्थापित आणि नामांकित संस्थांनाही या परिस्थितीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.

चौकट
मुख्याध्यापक आणि शिक्षकपदांचे गणित
माध्यमिक शाळांच्या निकषानुसार, एका तुकडीत किमान २० विद्यार्थी असणे अनिवार्य आहे अन्यथा संबंधित शिक्षकाचे पद धोक्यात येते. शाळेला पूर्णवेळ मुख्याध्यापक मिळण्यासाठी सहा वर्ग आणि किमान १०५ विद्यार्थ्यांची पटसंख्या आवश्यक असते. जर तीन वर्गांची शाळा असेल तर किमान ६५ विद्यार्थी असणे गरजेचे आहे. यापेक्षा पटसंख्या कमी झाल्यास मुख्याध्यापकाविना शाळा चालवण्याची वेळ येते.

कोट
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ही गळती थांबावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी पटसंख्या वाढवण्याची मोहीम हाती घेतली; मात्र त्याचे फलित काय ते उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यावरच कळणार आहे.
- श्रीधर शिगवण, शिक्षणॉविस्तार अधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com