

36873
ऑलिव्ह रिडले प्रजातीची
९५ पिले झेपावली समुद्रात
जैवविविधतेच्या संवर्धनास मोठे यश
मालवण, ता. १२ : तालुक्यातील वायरी भूतनाथ समुद्र किनाऱ्यावर निसर्ग संवर्धनाचा एक सुखद सोहळा नुकताच पार पडला. १७ फेब्रुवारी रोजी सुरक्षितरीत्या जतन केलेल्या अंडी उबवणी केंद्रातून तब्बल ५२ दिवसांच्या कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले प्रजातीची ९५ पिले सुखरूप बाहेर पडली. या चिमुकल्या पाहुण्यांना कासव मित्र आणि वनविभागाच्या मदतीने रात्रीच्या वेळी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच समुद्रात सोडण्यात आले.
१७ फेब्रुवारी रोजी स्थानिक रहिवासी लतिका प्रशांत पाटकर यांना समुद्र किनाऱ्यावर एक कासव अंडी घालण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित ''युथ बीट्स फॉर क्लायमेट'' या संस्थेला कळवले. संस्थेच्या सदस्यांनी पाहणी केली असता ते कासव दुर्मिळ ''ऑलीव्ह रिडले'' प्रजातीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कांदळवन विभागाला पाचारण करण्यात आले आणि बीच मॅनेजरमार्फत तिथून ११४ अंडी रेस्क्यू करण्यात आली.
अंड्यांच्या सुरक्षिततेसाठी कांदळवन कक्ष दक्षिण कोकण (वनपरिक्षेत्र मालवण) यांच्या मार्गदर्शनाखाली वायरी भूतनाथ येथील कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये ही अंडी स्थलांतरित करण्यात आली होती. गेल्या ५२ दिवसांपासून या केंद्रात अंड्यांची विशेष देखभाल घेतली जात होती. १० एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास अंड्यामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. ही बाब स्थानिक कासव मित्र श्रीकांत माडये यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ कांदळवन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर सर्व ९५ पिल्लांना अतिशय सुरक्षितरीत्या लाटांच्या प्रवाहात सोडून दिले. मोहिमेत कासव मित्र गणेश माडये, रसिका माडये, युगा माडये, संजू भगत, अमर मातोंडकर, विनय मातोंडकर आणि सौरभ मातोंडकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पिल्लांना समुद्राचा रस्ता दाखवला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या नियोजनामुळे समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनास मोठे यश मिळाले आहे.