

swt1220.jpg
43208
सावंतवाडी : जैवविविधता कार्यक्रमाचे उद्घाटन करताना संजय सावंत शेजारी डॉ. जयेंद्र परुळेकर, भाग्यश्री परब, सतीश लळीत, संदीप सावंत आदी.
वृक्षतोड झाली तरीही प्रशासन ढिम्मच
डॉ. जयेंद्र परुळेकर : महामार्गावरील वृक्षारोपणाबाबत जाब विचारण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ : तापमान वाढत आहे. वृक्षतोड होत आहे, तरीही प्रशासन ढिम्मच झाले आहे. राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गासाठी झाडांची कत्तल झाली. त्या झाडांच्या जागी वृक्षारोपण करण्यात येणार होते, त्याचे काय झाले हा जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संजय सावंत (वनश्री फाउंडेशन, तिलारी) आणि पक्षीतज्ज्ञ भाग्यश्री परब (रानबांबूळी) यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांचा सत्कार जैवविविधता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी कडून आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीव आणि पक्षी संवर्धनाच्या दृष्टीने मोलाची मदत सदर नेमणूकीमुळे होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी संजय सावंत आणि भाग्यश्री परब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ जयेंद्र परुळेकर, सुमेधा सावंत, सतिश लळीत, संदीप सावंत, सतीश देसाई, वनक्षेत्रपाल सुहास पाटील आदी उपस्थित होते. डॉ. परूळेकर म्हणाले, राज्यात महामार्गावर असलेल्या झाडांची कत्तल झाली पुन्हा ती लावली नाही तीच अवस्था झाराप ते पत्रादेवी आणि झाराप ते खारेपाटण या मुंबई गोवा महामार्गावरील कत्तल झालेल्या झाडांची आहे. आता जाब विचारला पाहिजे. जैवविविधता, वन संरक्षण व संवर्धन आणि वन्य जीव याबाबत आपण सजगता निर्माण केली आहे. सह्याद्री घाट अर्थात पश्चिम घाटाचे फार मोठे महत्त्व आहे. माधवराव गाडगीळ यांनी त्यांचे निरीक्षण वेळोवेळी मांडले आहे.
डॉ. परूळेकर म्हणाले, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये वृक्षतोड होत आहे. सरमळे गावात शंभर एकर जमीनीवर वृक्षतोड झाली आहे. कोलझर, सासोलीमधील वृक्षतोड झाली. मात्र, कारवाई झाली नाही. इको सेन्सिटिव्ह झोन आणि न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवून टाकले जात आहेत.
यावेळी मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत यांनी तिलारी परिसरातील वाघ, किंग कोब्रा,वन मानव, दुर्मिळ साप असं वन्यजीव वैभव आहे. मात्र, रिंग रोड, क्वॉरी आणि क्रशर ही चिंतेची बाब आहे. लोक तिलारी धरण परिसरात रिंगरोड मागत होते, तेव्हा अवघ्या पाच कोटी रुपये खर्चून बांधता आला असता, पण गैरसोयीमुळे जमिनी मालकांनी जमिनी विक्री केल्यानंतर आता तोच रिंग रोड परप्रांतीयासाठी १४० कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. हा झाला तर सह्याद्रीच्या पट्ट्याला फुट पडणार आहे, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.
पक्षीमित्र मानद वन्यजीव रक्षक भाग्यश्री परब, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, सतिश लळीत, सतिश देसाई, संदीप सावंत, काका भिसे, सुनील सावंत यांनी शक्तीपीठ महामार्ग, पर्यावरण, पक्षी, वन्य प्राणी, क्वॉरी आणि क्रशरबाबत भूमिका मांडली.