

पराडकर यांच्या ऋतुरंगला
अक्षरगौरव पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या ‘ऋतुरंग’ या कोकणातील फुलांवरील रंगीत पुस्तकाला राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा येथील सोमण सभागृहात अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाच्यावतीने आयोजित ‘कै. भास्करराव माने राज्यस्तरीय अक्षरगौरव साहित्य पुरस्कार’ वितरण करण्यात आले.
सातारा येथील कार्यक्रमावेळी ज्येष्ठ कवी-गझलकार धनंजय तडवळकर म्हणाले, ‘सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय गेली १४ वर्षे राज्यातील साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्यकृतींना राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. लिहित्या हातांचा सन्मान करणे आणि त्यामध्ये सलग चौदा वर्षे सातत्य राखणे ही कौतुकास्पद बाब असून, अश्वमेध ग्रंथालयाचे साहित्यक्षेत्रातील योगदान अभिमानास्पद आहे.’
या कार्यक्रमास ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, संस्थापक रवींद्र भारती, अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, कार्यवाह शशीभूषण जाधव आणि श्रीधर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पराडकर म्हणाले, ‘हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील, चित्रकार विष्णू परीट, प्रस्तावनाकार डॉ. उमेश मुंडल्ये, पाठराखण करणाऱ्या तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि सर्व वाचकांचा आहे.’
कविता प्रभुणे यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीधर साळुंखे यांनी आभार मानले.