

दहावी-बारावीचे गुणपत्रक,
प्रमाणपत्र आता एकत्रित
राज्य मंडळाचा निर्णय; यंदापासून अंमल
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३१ : दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्रपणे न देता एकत्रित मिळणार आहे. या बाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२६च्या परीक्षेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
राज्य मंडळाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भातील सर्व विभागीय मंडळांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेची बैठक १२ फेब्रुवारीला झाली. त्यात झालेल्या ठरावानुसार फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेपासून दहावी-बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्रपणे न देता एकत्रित देण्यात येणार आहेत. एकत्रित गुणपत्रकावर विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने विद्यार्थ्याच्या नावाचा उल्लेख असणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५च्या प्रवेशपत्रांवरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास त्यावर योग्य छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वाक्षरी करावी, असा आदेश दिला आहे. त्याकरिता मंडळाच्या संकेतस्थळावर ‘फोटो करेक्शन’ लिंक कार्यन्वित केली असून त्याद्वारे छायाचित्रात दुरुस्ती करावी, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या नावाच्या बदललेल्या क्रमाबाबत सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना माहिती द्यावी. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावात त्रुटी उद्भवणार असल्यास त्याबाबतची दुरुस्ती विभागीय मंडळामार्फत तातडीने करून घेण्याबाबत सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, तसेच सर्व संबंधित घटकांना लिखित स्वरूपात कळविण्याबाबतची कार्यवाही करावी, त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना डॉ. माळी यांनी राज्य मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांना दिली आहे.