रत्नागिरीत कासवांचा अंडी घालण्याचा काळ लांबला ; किनाऱ्यावरचा वावरही झाला दु्र्मिळ

tortoise procreatine time changes in ratnagiri rare seen in 14 beach in ratnagiri
tortoise procreatine time changes in ratnagiri rare seen in 14 beach in ratnagiri

गुहागर (रत्नागिरी) : हिवाळा सुरू झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरवात होते; मात्र यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोन वेळा समुद्राच्या पश्‍चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही किनारपट्टीवर कासवे आलेली नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्‍यातील वेळास, दापोली तालुक्‍यातील आंजर्ले, कोळथरे, केळशी, कद्रे, लाडघर, पाडले, मुरुड, दाभोळ, गुहागर तालुक्‍यातील गुहागर आणि तवसाळ, रत्नागिरी तालुक्‍यातील गावखडी आणि राजापूर तालुक्‍यातील माडबन व वाडावेत्ये या १४ गावांतील समुद्रकिनाऱ्यांवर वन विभागामार्फत ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. २०१९-२० या कालावधीत जिल्ह्यातील किनाऱ्यांवर ६५२ घरट्यांतील ६५ हजार ८५३ अंडी वन विभागाने संरक्षित केली 
होती. 

त्यापैकी ३२ हजार ४३३ अंड्यांतून बाहेर पडलेल्या कासवांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात वनविभागाला यश आले.
ऑलिव्ह रिडले जीवनचक्र अभ्यासक माधव मुधोळ म्हणाले की, मुळात गेल्या तीन-चार वर्षांचा अभ्यास केला तर अंडी देण्याचा कालावधी पुढे सरकत असल्याचे लक्षात येईल. याचे सामान्य कारण ग्लोबल वॉर्मिंग, हे आहे. 

हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडली अंडी, पहिले घरटे 
दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे घरटे वनविभागाला सापडले आहे. या घरट्यातून १३८ अंडी संरक्षित केली आहेत. कोकण किनारपट्टीवर या हंगामात सापडलेले हे पहिले घरटे आहे.

कासवांच्या जीवनचक्रावरही परिणाम, मिलनाचा काळ लांबला
यावर्षी कोकण किनारपट्टीला निसर्ग वादळाचा फटका बसला आहे. जमिनीवरील नुकसान आपल्याला दिसले. पण समुद्रदेखील चक्रीवादळामुळे ढवळून निघाला. त्यानंतरही पश्‍चिम, उत्तर समुद्रात दोनवेळा चक्रीवादळे झाली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडी उशिरा पडली. डिसेंबर महिन्यात पाऊस पडला.

या सर्वांचा परिणाम कासवांच्या जीवनचक्रावरही झाला आहे. ती इतस्तत: विखुरली गेल्याने त्यांच्या मिलनाचा काळ लांबला. स्वाभाविकरित्या अंडी घालण्याचा काळ लांबला आहे. यावर्षी जानेवारीपासून विणीच्या हंगामाला सुरवात होईल, असा अंदाज आहे, असेही माधव मुधोळ यांनी नमुद केले.

कासवीण अंडी घालण्यासाठी आलेली नाही

यावर्षीही वन विभागाने जिल्ह्यात कासव संवर्धन मोहिमेची तयारी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू केली; परंतु डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील १४ किनाऱ्यांपैकी एकाही किनाऱ्यावर कासवीण अंडी घालण्यासाठी आलेली नाही. त्यामुळे वन खात्याने नेमलेले कासवमित्र, वन खात्याचे अधिकारीदेखील चिंतेत आहेत.
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com