turtle Conservation campaign Forest Department in Diveagar Alibag
turtle Conservation campaign Forest Department in Diveagar Alibagsakal

Turtle Conservation : कासवांना नवसंजीवनी; दिवेआगारमध्ये वनविभागाकडून संवर्धन मोहीम

शंभरहून अधिक कासवांची पिल्ले हरिहरेश्‍वर समुद्रात सुखरूप

अलिबाग : समुद्र किनाऱ्यांवरील मानवी अतिक्रमणामुळे कासवांच्या प्रजननात खंड येतो. यामुळे ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल यांसारख्या कासवाच्या जाती कोकण किनारपट्टीतून नामशेष होतील की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.

मात्र, वनविभागाच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्‍वर आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यांवर सागरी कासव संवर्धन मोहीम सुरू केली आहे. नुकतीच शंभरहून अधिक कासवांची पिल्ले हरिहरेश्‍वर समुद्रात सुखरूप सोडण्यात यश आले आहे.

सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या सहाकार्यातून सुरू झालेल्या मोहिमेला आता चांगले यश मिळत आहे. यातून समुद्री कासवांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय उपखंडात चार ते पाच प्रकारच्या सागरी कासवांचा वावर दिसून येतो. यात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल या चार प्रकारच्या सागरी कासवांच्या प्रजातीचा समावेश आहे.

कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन प्रकारच्या सागरी कासवांचे अस्तित्व दिसून येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे कासवांचे अस्तित्व धोक्यात आले होते.

किनारपट्टीवरील वाढणारे प्रदूषण, मासेमारी जाळ्यात अडकून होणारा कासवांचा मृत्यू, कासवांची तस्करी आणि अंडी खाल्ल्यामुळे कासवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभाग, सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्‍वर आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यांवर या वर्षी कासव संवर्धन मोहीम राबविण्यात आली. रोहा वनविभागाच्या पुढाकाराने, हरिहरेश्‍वर पर्यटन विकास संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने हरिहरेश्‍वर समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या सागरी कासवांची अंडी संवर्धन करून ठेवण्यात आली आहे. दीड महिन्यानंतर यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्यास सुरवात झाली. येत्या काही दिवसांत उर्वरित अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

पिल्ले बाहेर येण्याचा हंगाम

साधारणपणे डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत कासव किनारपट्टीवर येऊन एका वेळी साधरण शंभर ते दीडशे अंडी घालतात. यातून ४५ ते ६५ दिवसांनी पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात होते. कासवाची अंडी खाल्‍ली जात असल्‍याने काही लोक ती पळवतात. आता वनविभागाच्या संरक्षणाखाली त्यांची जोपासणी होऊ लागली आहे. अंड्यातून पिल्ले बाहेर येईपर्यंत त्‍यांचे संवर्धन करणे गरजेचे असते. अन्यथा अंडी नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे किनाऱ्यावर जाळी लावून तयार केलेल्या संरक्षित क्षेत्रात अंड्यांची जपणूक केली जाते.

सागरी पर्यावरणात कासवांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे, मात्र सध्या कोकण किनारपट्टीवरून कासव दिसेनासे झाले आहेत. कासव संवर्धन मोहिमेला स्थानिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आता सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. कासवांची अंडी संकलित करून ती संरक्षित केलेल्या ठिकाणी आणून देत आहेत. या मोहिमेतून दिवेआगर येथे या वर्षी तीनशे ते चारशे कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात येणार आहे.

- मिलिंद राऊत, वनक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन

अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांचा समुद्रपर्यंतचा प्रवास पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. जणू कासवांचा जन्मोत्सवच येथे साजरा केला जातो. स्थानिकांमध्येही कासव संवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली असून पर्यटकांना या प्रकल्पाची माहिती आवर्जून दिली जाते.

- सिद्धेश पोवार, सचिव, पर्यटन विकास संस्था, हरिहरेश्‍वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com