उदय निरगुडकर म्हणाले ; सीएए कायद्याने मुस्लीमांना धोका नाही...

Uday Nirgudkar said CAA law does not endanger Muslims kokan marathi news
Uday Nirgudkar said CAA law does not endanger Muslims kokan marathi news

कणकवली (सिंधुदूर्ग) : सीएए अर्थात नागरिकत्व दुरूस्ती कायद्यामुळे देशातील मुस्लीमांना कोणताही धोका नाही. तर गेले तीन पिढ्या निर्वासित म्हणून जगत असलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांनी येथे व्यक्त केले. एनआरसी कायद्याबाबत त्यांनी बोलणे टाळले.

आम्ही भारतीय मंच कणकवलीच्यावतीने येथील भगवती मंगल कार्यालयात श्री.निरगुडकर यांचे ‘सीएए आणि एनआरसी संदर्भात मार्गदर्शन व शंका निरसन’ या विषयावर व्याख्यान झाले. दोन तासाच्या भाषणात त्यांनी केंद्रातील मोदी सरकार अतिशय उत्तम कामगिरी करत असल्याचे अनेक दाखले दिले. तसेच सीएए आणि एनआरसी समजून सांगायला सरकार कमी पडले याचीही कबूली दिली.

वनवास संपावण्यासाठी  सीएए कायदा
डॉ.निरगुडकर म्हणाले, फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील हिंदूची संख्या 13.5 टक्के होती ती आज 1.16 टक्क्यावर आली आहे. तर बांग्लादेशमध्येही 1971 मध्ये 13.5 टक्के असलेले हिंदू आज तेथे 8.5 टक्के एवढ्यावरच सीमित राहिले आहेत. याचा अर्थच मूळी ही लोकसंख्या एकतर मारली गेली, त्यांचे धर्मपरिवर्तन झाले वा निर्वासित म्हणून ते भारतात आले. ते गेल्या तीन पिढ्यांपासून शरणार्थी म्हणून जगत आहेत. त्यांना कुठल्याही शासकीय सुविधा, आरोग्य उपचार मिळत नाहीत. त्यांचा वनवास संपावा यासाठीच सीएए कायदा केंद्राने संमत केला आहे.

इंटरनेटवर आग भडकावणारी फौज
 मुस्लीम समाजाला सीएए मुद्द्यावरून भरकटवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत असल्याचा आरोप श्री.निरगुडकर यांनी केला. तसेच  या राजकीय पुढार्‍यांनी देशाला गैरसमजाच्या विद्यापीठात उभे केले आहे. सीमेच्या पलीकडे आग भडकावणार्‍या ट्रोलर्सची फौज इंटरनेटच्या माध्यमातून वावड्या उठवित असल्याचाही दावा त्यांनी केला.

नागरिकत्व मिळणार का? 
देशातील निर्वासितांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत अथवा पुरावे नाहीत असे वक्तव्य डॉ.निरगुडकर यांनी व्याख्यानात केला होता. तोच धागा पकडत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मांजरेकर यांनी, जर मुस्लीम व्यक्तींनी आपण हिंदू निर्वासित असल्याचे सांगितले तर त्यांना नागरिकत्व मिळणार का? असा प्रश्‍न केला. प्रश्‍नावर डॉ.निरगुडकर काही क्षण गोंधळले. हिंदूचे सणवार, तिथी हे मुसलमानांना माहिती नसतात असे उत्तर या प्रश्‍नावर त्यांनी दिले.

श्रोत्यांचा अपेक्षाभंग
दोन तासाच्या संपूर्ण व्याख्यानात सीएए कायदा कसा चांगला आहे याबाबतचे भाष्य डॉ.निरगुडकर यांनी केले. एनआरसी बाबत बोलणेच टाळले त्यामुळे भाषण संपल्यानंतर अनेक श्रोत्यांनी सीएए आणि एनआरसीचा नेमका कायदा काय? त्यातील तरतूदी समजून सांगा अशी विनंती केली. परंतु या दोन्ही कायद्याबाबतची ठोस माहिती डॉ.निरगुडकर देऊ न शकल्याने श्रोत्यांचा अपेक्षाभंग झाला. तशी चर्चाही सभागृहात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com