भान ठेवून काम करा,जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी खडसावले

Uday Samant
Uday SamantSakal

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अधिकारी विकासकामामध्ये राजकारण करू नये. मात्र या कार्यक्रमात त्यांनी राजशिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) नावाखाली राजकारण करणे योग्य नाही. निमंत्रण पत्रिकेतून अनेक राजकीय नावे वगळली. आता अधिकाऱ्यांनी निवडणूक लढवायला हरकत नाही. मात्र ही जनतेची काम आहेत, जरा भान ठेवून काम करा. जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांना आवर घालावा, असा इशारावजा दम उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी अधिकाऱ्यांना दिला. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अनेक अधिकाऱी गैरहजर होते.

अनेख वर्षे रखडलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, तहसीलदार शशिकांत जाधव, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, बाबू म्हाप, परशुराम कदम, सौ. भारती सरवणकर, पंचायत समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला मंत्री सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर अल्पबचत सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ९ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारी इमारत वर्षभरात पूर्ण करा, अशी सूचना सामंत यांनी ठेकेदाराला केली.

उदय सामंत म्हणाले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना राजकारण करू दे. राजशिष्टाचार काय असतो हे मलाही माहिती आहे. अधिकारी जनतेचे सेवक आहेत. त्यांनी जनतेला वेठीस धरू नये. तुम्हाला अधिकार असतील. परंतु मंत्री म्हणून आम्हालाही काही अधिकार आहेत याचे भान ठेवा. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला अनेकवेळा मला निमंत्रण नसते. काहीवेळा कार्यक्रमापूर्वी सांगितले जाते. परंतु राजशिष्टाचार बाजूला ठेवून मी कार्यक्रमाला उपस्थित राहतो. जनतेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे माझे कर्तव्य आहे. येथे मी राजशिष्टाचार बघत बसत नाहीत. परंतु आज अधिकाऱ्यांना आवर घालण्याची वेळ आली आहे.

निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय लोकांची का नावे वगळली. याचा जाब मी विचारणार आहे. मात्र ज्यांना निमंत्रण नाही, त्याची यादी द्या, मी त्यांची जाहीर माफी मागतो, असेही सामंत यांनी सांगितले. या सगळ्या प्रकरणामुळे गटविकास अधिकारी चांगलेच घाबरले. तेव्हा सामंत यांनी त्यांचे नाव घेऊन तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहे, असे स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेचे प्रशासन नेमकं काय करतंय, हे तपासण्याची वेळ आली आहे. अथक प्रयत्न करून जिल्ह्याला रुग्णवाहिका दिल्या. त्या निवळीमध्येच उभ्या होत्या. आरोग्य अधिकाऱ्यांना त्याची सुतराम कल्पनाही नाही. सरकारी रुग्णवाहिका असुनही पासिंगसाठी आरटीओ कार्यालयाबाहेर तासन्‌‍तास उभ्या राहतात. परंतु अधिकाऱ्यांना त्याचे काहीही घेणे-देणे नाही. हेही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे सामंत म्हणाले. उपसभापती उत्तम सावंत यांनी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत अधिकाऱ्यांची नावे राहिली असतील. परंतु जनतेचा कार्यक्रम म्हणून व मंत्री उपस्थित असताना अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. हा पक्षीय नव्हे, शासकीय कार्यक्रम आहे. याची गांभीर्याने दखल घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com