राजापूर : दलालांची साखळी मोडीत काढून शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याला थेट देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोकणातील हापूसचा जागतिकस्तरीय ‘ग्लोबल ब्रॅंड’ विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला.
कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी कोकण भूमी प्रतिष्ठान आणि आडीवरे-कशेळी आंबा उत्पादक संघात झालेल्या बैठकीमध्ये ग्लोबल ब्रॅंडच्या माध्यमातून यावर्षी मुंबई, दिल्ली, बेंगलोरसह युरोप, अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्येही आंबा विक्री करण्याचे निश्चित करण्यात आले. तालुक्यातील तावडे भवन येथे झालेल्या बैठकीला कोकण भूमी प्रतिष्ठानचे यादवराव यांच्यासह इफ्तीकार चरफरे, अजित मराठे, कृषी विस्तार अधिकारी सुहास पंडित, प्रभाकर आपटे, आंबा व्यावसायिक बाबू अवसरे, ॲड. समीर कुंटे, सुरेंद्र कारेकर, प्रकाश डुकले, रवींद्र सकपाळ, श्रीपाद कुंटे, सुहास कशाळकर यांच्यासह बागायतदार उपस्थित होते.
हापूस आंब्याला देश-परदेशातून मागणी असते. त्यातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते; मात्र दलालांच्या मोठ्या साखळीमुळे त्याचा थेट फायदा शेतकरी वा आंबा व्यावसायिकांना होताना दिसत नाही. दलालांची साखळी मोडण्यासाठी कोट्यवधीच्या उलाढालीची फायदा थेट शेतकरी वा आंबा व्यावसायिकाला मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी कोकणातील हापूस आंब्याचे ग्लोबल ब्रॅंड विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले. तालुक्यासह पावस, रत्नागिरी, विजयदुर्ग, जामसंडे या परिसरातील शेतकऱ्यांशी त्यादृष्टीने संवाद साधण्यात आला.
"दलालांची साखळी मोडीत काढून येथील शेतकऱ्याला बाजारपेठेमध्ये थेट आंबा विकता यावा, या उद्देशाने हापूस आंब्याचा ‘ग्लोबल ब्रॅंड’ विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानने स्थानिक शेतकऱ्यांसमवेत पुढाकार घेतला आहे."
- ॲड. समीर कुंटे
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.