Vidhan Sabha 2019 : संदेश पारकर म्हणाले माघार यासाठीच...

Vidhan Sabha 2019 : संदेश पारकर म्हणाले माघार यासाठीच...

कणकवली - चार वेळा पराभव पत्करलेल्या नारायण राणे यांचा जनाधार संपला आहे. तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मी उभा राहिलो असतो तर मतविभागणी होऊन राणेंना फायदा झाला असता. मात्र, राणेंना पुन्हा मुंबईत पाठवायचे आहे. त्यासाठी सतीश सावंत यांना पाठिंबा देत शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. राणेंची प्रवृत्ती रोखण्यासाठीच निवडणुकीतून माघार घेतली, असे भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी आज सांगितले.

येथील आपल्या निवासस्थानी श्री. पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेण्याबाबतची भूमिका मांडली. यावेळी भाजपचे अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संदेश पटेल, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, अवधूत मालणकर, प्रीतम मोर्ये, भाई पारकर उपस्थित होते.

श्री. पारकर म्हणाले, ‘‘तीन वर्षांपूर्वी मी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर कणकवलीसह वैभववाडी आणि देवगड तालुक्‍यात संघटना बांधली. विधानसभेचा प्रबळ उमेदवार म्हणून काम करीत असताना विविध उपक्रम राबविले. कणकवली मतदारसंघात माझ्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी माघार घेतली होती; मात्र ऐनवेळी राणेंना भाजपत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली; मात्र राणेंचा प्रवेश भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही. आजवर ज्या राणे प्रवृत्तीशी लढलो, त्या राणेंसोबत काम कसे करायचे? ही भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे.’’

ते म्हणाले, ‘‘कणकवली विधानसभेसाठी भाजपची अनेक मंडळी इच्छुक होती. कुठल्याही प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी द्या. त्याच्या प्रचाराचे काम आम्ही करू; पण नीतेश राणे भाजपत नको. राणे भाजपत आल्यास हा पक्ष राणेंची भाजप म्हणून ओळखला जाईल. ज्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत राणेंविरोधात संघर्ष केला त्यांचे खच्चीकरण होईल. त्यामुळे राणे प्रवेशाला विरोध होता. तरी देखील अंतीम क्षणी प्रवेश देऊन नीतेश राणेंना उमेदवारी देण्यात आली; मात्र हा प्रवेश भाजपच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे राणेंच्या प्रचारात भाजपचे कार्यकर्ते उतरणार नाहीत.’’

राणे कुणाशीही प्रामाणिक नाहीत
महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांची भूमिका नेहमी बदलणारी राहिली आहे. ज्या शिवसेनेने राणेंना मुख्यमंत्री केले त्यांच्या विरोधात राणेंनी काम केले ज्या काँग्रेसने मंत्रीपद दिले त्यांच्या विरोधात राणे राहिले. दोनदा मुलाचा आणि दोन वेळा स्वत:चा असे राणेंचे चार पराभव झाले. त्यानंतर अडगळीत पडलेल्या राणेंना भाजपने खासदार बनविले; मात्र त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात स्वाभिमानच्या माध्यमातून सिंधुदुर्गात काढलेल्या विश्‍वास यात्रेमध्ये मोदी-फडणवीस सरकारवर टीका करण्याचे काम राणेंनी केले. राणेंची ही बदलती भूमिका भाजपला घातक आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष बदलून प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाचा घाट राणेंनी घातला आहे, असा आरोप पारकर यांनी केला.

मतविभागणी टाळण्यासाठी माघार
कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून नीतेश राणे तर शिवसेनेकडून सतीश सावंत यांचा अर्ज कायम कायम राहिला आहे. यात मी माझी उमेदवारी कायम ठेवली असती तर सतीश सावंत आणि माझ्यात राणे विरोधी मते विभागली असती. राणे प्रवृत्तीला ती मदतच ठरली असती. राणे प्रवृत्ती संपविण्यासाठीच निवडणूक रिंगणातून माघार घेतली. यावेळी कुठलीही अभिलाषा न ठेवता शिवसेनेच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आमचा विरोध राणेंना’
सतीश सावंत यांच्या रूपाने जनतेला सक्षम पर्याय मिळाला आहे. आता एकास एक लढत होईल. यात संदेश पारकर यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. आम्ही भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधात नाही. आमचा विरोध राणेंना असल्याचे अतुल रावराणे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com