Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी फसवल्याची राणेंकडून कबुली

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी फसवल्याची राणेंकडून कबुली

कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले.

येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिवसेनेच्या प्रचार सभा झाली. यात खासदार राऊत यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजप युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना उमेदवार सतीश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत पालव, राजू शेट्ये, प्रथमेश सावंत, ऍड.हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, भालचंद्र दळवी आदी उपस्थित होते.

श्री. राऊत म्हणाले, ""राणे जिकडे जातील तिकडचा पक्ष परिवार बिघडविल्याखेरीज राहत नाहीत. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान या पक्षानंतर ते आता भाजपमध्ये येत आहेत; मात्र राणेंच्या या स्वभावाची कल्पना भाजप नेत्यांना असल्याने त्यांना अजूनही प्रवेश दिलेला नाही. अप्पासाहेब गोगटे यांच्यानंतर अॅड. अजित गोगटे तसेच प्रमोद जठार यांनी कणकवली - देवगड मतदारसंघाची परंपरा जपली. आता ही परंपरा सतीश सावंत पुढे चालू ठेवतील.''

सतीश सावंत म्हणाले, ""माझं शिक्षण लंडनमध्ये झालं नाही, हे फार चांगलं झालं. कणकवली कॉलेजमध्ये पदवी शिक्षण घेतल्यामुळे मला इथले प्रश्‍न समजले. जनतेचे दुःख जाणून घेता आलं.'' इथल्या आमदारांच्या कार्यकर्तृत्वामुळे मतदारसंघात एकही भटकं कुत्रं नाही. औषधे जनतेच्या दारी जात आहेत. रोजगार मेळाव्यामुळे बेरोजगारीची समस्या सुटली असल्याची कोपरखळीही श्री. सावंत यांनी मारली.

सावंतवाडी आणि कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. आता कणकवली मतदासंघातही शिवसेनेचा आमदार असेल. आम्ही दोन पेट्रोल पंप आणले पण ते पोलिस कल्याण निधीसाठी. कुडाळमध्ये सिनेमागृह सुरू करतोय ते सुद्धा शासनामार्फतच. वैयक्‍तिक स्वार्थासाठी आम्ही पेट्रोलपंप, सिनेमागृह सुरू करत नसल्याची टीका आमदार नाईक यांनी केली.

कणकवली विधानसभेचे तिकीट संदेश पारकर यांना न मिळाल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली होती. आता त्यांनी नीतेश राणे यांना कणकवलीची उमेदवारी दिलीय. त्यामुळे राजकीय संन्यास कधी घेणार ते जठार यांनी जाहीर करावे असे आवाहन भाजप युवा नेते पारकर यांनी केले.

ज्या नीतेश राणेंनी गडकरी पुतळा तोडण्यासाठी बक्षीस जाहीर केले. सतत भाजपवर टीका केली. भिडे गुरू, बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत अनुद्‌गार काढले त्यांनाच भाजपने कणकवलीचे तिकीट देऊन भाजपची नीतीमुल्ये पायदळी तुडवली असल्याची टीका अतुल रावराणे यांनी केली.

जठार आता राणेंसाठी जीव द्यायला तयार
चार महिन्यापूर्वी नारायण राणेंची भाजप पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष जठार यांनी केली होती. तेच जठार आता राणेंसाठी जीव द्यायला तयार झाले आहेत. गेल्या चार महिन्यात असे काय घडले की जठारांना राणेंसाठी जीव द्यावासा वाटतो याचेही उत्तर श्री.जठार यांनी जनतेला द्यावे असे श्री. राऊत म्हणाले.

भाजपत नसताही विधान परिषदेची आश्‍वासने
2009 पासून नारायण राणे मला विधान परिषदेच्या आमदारकीच आश्‍वासने देत आहेत. राणेंचा अजून भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. तरीही महिन्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा आमदारकीचे आश्‍वासन दिले. मी आमदार व्हावं ही जनतेची इच्छा होती; पण राणेंनी जनमताचा आदर केला नाही. तसेच आता मला ते बेईमान म्हणताहेत; पण एवढे पक्ष बदलणारे खरे बेईमान कोण आहेत अशी टीका सतीश सावंत यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com