कोट्यावधींच्या काजू बी चे करायचे काय?

What to do with billions of cashew nuts?
What to do with billions of cashew nuts?

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो काजू बागायतदारांच्या घरात कोट्यवधींचे काजू बी खरेदीविनापडून आहे. कमीत कमी 120 रुपये प्रतिकिलोला दर मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पावसाळा पंधरा दिवसांवर आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण काजूवर आहे. गेल्या दहा वर्षांत काजू लागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. दरवर्षी पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर काजू होता. काही वर्षात चांगला दर देखील मिळाला. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी या लागवडीत रस दाखविला. काजू एकमेव पीक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतले जाते. त्यापासून होणारी आर्थिक उलाढाल एक ते दीड हजार कोटींच्या घरात आहे. 
अतिवृष्टी, क्‍यार वादळ आणि त्यानंतर सततचे ढगाळ वातावरण यामुळे यंदा उत्पादनात 40 टक्के घट झाली. साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जिल्ह्यात हंगाम सुरू झाला. त्यावेळी साधारणपणे प्रतिकिलोला 140 रुपये दर होता. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये काजूला चांगला बहर येतो. बहर येत असतानाच कोरोनाचे सावट आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काजू खरेदी बंद केली. याच संधीचा फायदा घेऊन काही व्यापाऱ्यांनी काजू दर 70 ते 75 रुपयांपर्यंत खाली नेऊन ठेवला. त्यामुळे बागायतदारांनी विक्री थांबविली. 
शेतकऱ्यांनी प्रतिकिलो 120 रुपयेपेक्षा कमी दराने विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले. तशा स्वरूपाच्या तालुकानिहाय बैठकासुद्धा झाल्या. त्यामुळे काजूची विक्री होताना दिसत नाही. प्रत्येक शेतकऱ्यांकडे किमान शंभर ते एक हजार किलोपर्यत काजू बी शिल्लक आहे. मोठ्या बागायतदारांकडे टनांमध्ये काजू शिल्लक आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. प्रत्येक बागायतदारांकडे काजू साठवणूक करून ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळी वातावरणात काजू खराब होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे पाऊस जवळ येतोय तसतशी शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. 


""माझ्याकडे सुमारे सातशे किलो काजू बी आहे. अनेक व्यापाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु कुणीही 90 रुपयांपेक्षा अधिक देण्यास तयार होत नाही. त्यातही वेंगुर्ले सातला वेगळा आणि वेंगुर्ले चार जातीला वेगळा दर सांगितला जातो. सध्या व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे काजूला हमीभाव मिळण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.'' 
- राजाराम वळंजू, काजू उत्पादक शेतकरी, खांबाळे 

"एका राज्यातील व्यापाऱ्यांशी आमची चर्चा सुरू आहे. अन्य राज्यातील व्यापारी असल्यामुळे पास आणि इतर काही गोष्टीची पूर्तता होण्यास विलंब होत आहे; परंतु शेतकऱ्यांला चांगला दर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' 
- सतीश सावंत, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com