Where Is Government After Storm Devendra Fadnavis Comment
Where Is Government After Storm Devendra Fadnavis Comment

वादळानंतर सरकारचे अस्तित्व आहे कोठे?, फडणवीस यांचा सवाल 

दाभोळ ( रत्नागिरी ) - चक्रीवादळाने वाताहात होऊन 10 दिवस झाले तरी सरकारचे अस्तित्व कुठेच दिसून आलेले नाही. सरकारने केलेल्या कोणत्याही घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही, डिझास्टर्स होत असतात, ते आपण थांबवू शकत नाही पण ते झाल्यानंतर आपण त्याला कसे तोंड देऊ शकतो हे महत्त्वाचे आहे. मात्र असा प्रतिसाद शासकीय पातळीवर कोठेही आढळून आला नाही, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. 

फडणवीस म्हणाले, ""सरकारने निर्णय घेत असताना कोकणाची वस्तुस्थिती व परिस्थिती काय आहे याचा विचार न करता जो स्टॅन्डिंग जीआर आहे, त्यातच बदल करून पॅकेज जाहीर केले. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात त्याचा फायदा मिळेल असे वाटत नाही. या पॅकेजमध्ये मासेमारी करणाऱ्यांचा विचार नाही. अनेक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भातील कोणतेच धोरण घोषित केलेले नाही. डिझेलचा परताना सरकारने तत्काळ दिला तरी थोडसे पैसे मच्छीमारांच्या हाताशी येतील. तातडीची मदतही 10 हजार तीही तत्काळ दिली पाहिजे. मच्छीमारांच्या बोटींचे, जाळ्यांचे नुकसानासाठी शासनाने मदत केली पाहिजे.'' 

घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यांना ग्रामीण भागात 2 लाख 50 हजार, तर शहरी भागात 3 लाख 50 हजार याच पद्धतीने मदत मिळाली पाहिजे. सिमेंटच्या पत्रे तातडीने मिळणे गरजेचे आहे. पण काहीजण त्याचा काळाबाजार करतात. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कोकणातील माणूस स्वाभिमानी आहे, तो कुणाकडे काही मागत नाही. त्यामुळे कोकणी माणसाने जमेल तेथून हे सिमेंटचे पत्रे आणून आपल्या घरावर घातले आहेत. पण अनेकांना हे उपलब्ध झालेले नाहीत. 

शेतकऱ्यांचे चालू कर्ज माफ करावे लागेल. त्यासोबत भविष्याकरिता दीर्घ मुदतीचे कर्ज देणे गरजेचे आहे त्यातही व्याजात सवलत द्यावी लागेल. पर्यटन उद्योगाच्या उभारणीसाठी मदत करावी लागणार आहे. उद्योगावर असलेली कर्ज कशी स्थगित करावी लागतील, त्यांच्या कर्जाची मुदत कशी वाढवून देता येईल याचा राज्य शासनाने आता विचार करण्याची गरज आहे, असेही फडणवीस यानी सांगितले. 

उत्पन्न देणाऱ्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या. जी झाडे उभी आहेत तीही पावसात पडण्याची शक्‍यता आहे. सरकारने हेक्‍टरी 50 हजार मदत जाहीर केली आहे. पुढील 10 वर्षे काहीच उत्पन्न मिळण्याची शक्‍यता नाही. दर गुंठ्याला केवळ 500 रुपये मिळणार ते बागा साफ करण्यासाठीही पुरणार नसल्याचे फडणवीस यानी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com