बिनविरोध ग्रामपंचायतीची ६२ वर्षांची परंपरा ; यंदाही परंपरा टिकवणार

without opposition 62 year gram panchayat election in guhagar ratnagiri
without opposition 62 year gram panchayat election in guhagar ratnagiri

गुहागर (रत्नागिरी) : राजकीय पक्षांना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्‍यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. या वेळीही सात सदस्यांसह सरपंचपदाची निवडणूक उमराठ गावाने बिनविरोध केली. फक्त गावाच्या निर्णयावर शासनाचे शिक्कामोर्तब होणे 
बाकी आहे.

यंदा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. हा बदलही उमराठमधील ग्रामस्थांनी स्वीकारला आहे. गेली ६० वर्षे या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय येथील ग्रामस्थांना जाते. पूर्वी प्रभागरचना नसताना गावकीत उमेदवार ठरवला जात असे. तालुक्‍याला जाणारा, चार शब्द लिहिता-वाचता येणारा सरपंच बनायचा. प्रभाग रचना झाल्यावर प्रत्येक प्रभागातील ग्रामस्थ एकत्र बैठक घेऊन उमेदवार ठरवायचे. नंतर गावकीत त्याला मंजुरी मिळायची.

आरक्षण आल्यावर जातीचे प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य दिले गेले. हळूहळू वेगवेगळ्या कारणांनी जातीचे प्रमाणपत्र सर्वांकडे आली. मग निवडीचे नियम थोडे बदलले. या सर्व निर्णयांना मंजुरी देण्याचे ठिकाण गावकी. हे मात्र आजपर्यंत कायम आहे. दोन दिवसांपूर्वीच उमराठची गावकी झाली. १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी सात उमेदवार निश्‍चित झाले. त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सध्या गावातील काही मंडळी करीत आहे.

महिला आरक्षणात अडचण

महिला आरक्षण आल्यावर ग्रामस्थांची थोडी अडचण झाली. पुरुषप्रधान संस्कृतीत गावात नेतृत्त्व करेल, अशी महिला मिळणे कठीण. काही वेळ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असे आरक्षण पडल्यावर जातीचे प्रमाणपत्र असलेली महिला मिळणे कठीण, असेही प्रसंग आले. अशावेळी प्रभागांमध्ये उमेदवारांची अदलाबदल करण्याचे प्रयोगही गावाने केले. 

ग्रामसभाही दणक्‍यात

उमराठचे ग्रामस्थ केवळ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करत नाहीत तर येथील ग्रामसभादेखील १५० पेक्षा जास्त संस्थेच्या होतात. कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आजपर्यंत या गावात आलेली नाही.

सगळे बदल, स्वीकारले सहज...

गुहागर तालुक्‍यातील उमराठ ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत या गावात कधीही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यपद्धतीत अनेक बदल होत गेले. प्रभाग रचना एकाच प्रभागातून सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण, त्यामध्ये ५० टक्के महिलांना आरक्षण, जनतेतून सरपंच असे सगळे बदल, या गावाने सहज स्वीकारत बिनविरोधची परंपरा कायम ठेवली आहे. 
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com