चाकरमानी उत्सुक, पण कोकणवासीयांत धास्ती, अनेक प्रश्न

workers issue konkan sindhudurg
workers issue konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अवघ्या दीड महिन्यात गणेश चतुर्थी सण येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमानी गावी येण्यासाठी उत्सुक आहेत. याबाबत शासकीय पातळीवरही नियोजन सुरू झाले आहे. स्थानिकांमध्ये मात्र याबाबत धास्ती असून येणाऱ्या चाकरमानी लोकांना संस्थात्मक, रुम क्वारंटाईन की होम क्वारंटाईन करण्यात येईल, यावर गावा गावात चर्चांना उधाण आले आहे. पालिका व तालुकास्तरावर सरपंच संघटनेची भूमिका यात महत्वाची ठरणार आहे. 

कोकणातील मोठ्या आनंदाचा उत्साहाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. या उत्सवाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणामध्ये दाखल होतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली श्री गणेश चतुर्थी होत आहे. मुंबई, पुणे यासारख्या भागातून चाकरमानी प्रशासनाचा ग्रीन सिग्नल भेटल्यास दाखल होणार आहेत. चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले तर किंवा दाखल नाही झाले तर त्याबाबत नियोजन कसे असणार याविषयी गावागावात चर्चांना उधाण आले आहे. 

मुंबई, पुणे व अन्य भागातून येणाऱ्या चाकरमानी लोकांना संस्थात्मक, रूम की होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. याचा विचार करून त्याबाबत प्रशासनाने धोरण ठरविण्यासाठी हालचालीही सुरू केल्या आहेत. या हालचाली करताना आवश्‍यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. याबाबत प्रत्येक तालुक्‍यात सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणेही महत्वाचे बनणार आहे. 

कोरोना संकटापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवानिमित्त सुमारे पंचवीस हजार चाकरमानी आले होते. त्यातील काही चाकरमानी पुन्हा परतले नव्हते ते गावीच राहिले तर कोरोना संकटानंतर आतापर्यंत सुमारे लाख ते दीड लाख चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. त्यामुळे चतुर्थी सणाला मुंबईहून आता मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होण्याची शक्‍यता आहे; मात्र राज्यातील संवेदनशील भागातील स्थिती पाहता मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जागेअभावी कसेबसे मुंबईत राहत असलेले चाकरमानी तसेच बेरोजगार झालेले चाकरमानी यांना मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चतुर्थी सणानिमित्त कोकणामध्ये येण्याचे वेध लागले आहेत.

चाकरमान्यांना चतुर्थी सणाची चिंता असली तरी ज्यांचे स्वतंत्र फ्लॅट आहेत किंवा ज्यांची राहण्याची सुरक्षित व व्यवस्थित सोय आहे त्यांनी मुंबई किंवा परिसर सोडू नये, असेही सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे हे स्पष्ट आहे; मात्र येणाऱ्या चाकरमान्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले तरी कुठच्या ना कुठच्या मार्गे त्यांचे संक्रमण सर्वसामान्यांना पर्यंत होण्याचा धोका होऊ शकेल, अशी धास्ती गावोगाव आहे. 

स्थानिक प्रशासनाचीही भूमिका 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आधीच मोठ्या प्रमाणात चाकरमानी आले आहेत. आता गौरी-गणपती सणाच्या काळात आणखी चाकरमानी रेल्वे, बस या सुविधा नसल्याने ते स्वतःची किंवा खासगी तसेच भाडेतत्त्वावर वाहने घेऊन येणार असल्याने यंदाचा गौरी गणपतीचा सण महागाईचाही उच्चांक गाठेल हे नक्की. या पार्श्‍वभूमीवर योग्य ते नियोजन करताना प्रशासनाने नगरपालीका, ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेऊन नियमावली तयार करावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com