
त्यासाठीच पार्लमेंट ते पंचायतीमध्ये भाजपची सत्ता आणण्याचे ध्येय आहे.
रत्नागिरी : सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा बनणे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक होणे आवश्यक आहे. त्यासाठीच पार्लमेंट ते पंचायतीमध्ये भाजपची सत्ता आणण्याचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन करू, असा विश्वास आमदार रवींद्र चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना केला.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सामोरा जात आहे. त्यामुळे त्याचे नियोजनही तितकेच चांगले करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकासाच्या अनेक योजना आणल्या आणि त्याचा लाभ ग्रामस्थांना मिळाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, सुशिक्षित मतदारांनी भाजप प्रणित पॅनेलला मदत केली आहे. गेले महिनाभर भाजपचे नेते दक्षिण व उत्तर रत्नागिरीमध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करत आहेत.
हेही वाचा - कायद्याची जाणीव जागविणारे म्युझियम
माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी एकत्रित दौरे केले. रत्नागिरी मुन्ना चवंडे, लांजा मुन्ना खामकर, राजापूर अभिजित गुरव, संगमेश्वर प्रमोद अधटराव, यांनीही प्रचारासाठी चांगला वेळ दिला.
गावागावांतील नियोजनाची जबाबदारी या सर्व तालुकाध्यक्षांनी पार पाडली आहे. भाजपचे प्रमुख पदाधिकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रचारासाठी घरोघरी फिरत होते. या प्रचारासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यात आल्याचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
संपादन - स्नेहल कदम