भारताचा म्यानमारविरुद्ध ६४ वर्षांत प्रथमच विजय

भारताचा म्यानमारविरुद्ध ६४ वर्षांत प्रथमच विजय

मुंबई - अखेरच्या काही मिनिटांत गोल स्वीकारण्याचा इतिहास असलेल्या भारतीय फुटबॉल संघाने ही परिस्थिती बदलली. भारतीयांनी म्यानमारविरुद्धचा ६४ वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवताना आशियाई पात्रता फुटबॉल स्पर्धेतील आव्हान कायम राखले. यांगून येथे मंगळवारी झालेली भारत-म्यानमार लढत बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच सुनील छेत्रीने भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास अप्रतिम गोल करीत भारतास विजयी केले. उदांता सिंग याला उत्तरार्ध सुरू झाल्यावर काही मिनिटांत मैदानात उतरवण्याची चाल यशस्वी ठरली. छेत्रीनेच सुरू केलेल्या चालीवर उदांताने उजव्या बगलेतून चाल रचली आणि त्याच्या अचूक पासवर छेत्रीने म्यानमार गोलरक्षकास चकवले आणि भारतास १-० असे विजयी केले. 

खरे तर या सामन्यात वेगळेच चित्र दिसले. म्यानमारने चेंडूवर जास्त हुकूमत राखली; पण गोल करण्याच्या संधी जास्त भारताने निर्माण केल्या. पूर्वार्धात जॅकिचंद सिंगने छेत्रीच्या अप्रतिम चालीवर गोल करण्याची सोपी संधी दवडली होती; तर उत्तरार्धात सुनील छेत्रीच्या अचूक पासवर उदांता सिंग गोल करण्याच्या स्थितीत असताना त्याला खाली पाडले होते; पण तरीही पंचांनी भारतास पेनल्टी देणे टाळले. त्या वेळी आजचा दिवस भारताचा नाही असेच वाटत होते; पण अखेर छेत्रीने भरपाई वेळेत संधी साधली. सामन्यात मिळालेल्या दोन मिनिटांच्या भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटास छेत्रीने निर्णायक गोल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com