
...म्हणून विराटवर बाबरपेक्षा अधिक दबाव; इंझी भाईची 'मन की बात'
पाकिस्तान (Pakistan Cricket team) क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) यांनी दुबईत रंगणाऱ्या हायहोल्टेज सामन्यात विराट कोहलीवर (Virat Kohli) अधिक दबाव असेल, असे मत मांडले आहे. बाबर आझम ((Babar Azam) ) हा अजून नवखा आहे. त्याला एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी अजून काही अवधी लागेल, असा उल्लेखही त्यांनी केलाय.
भारत-पाक सामन्यापूर्वी (India vs Pakistan) इंझमाम उल हक यांनी विराट आणि बाबर दोघही सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले. सध्याच्या घडीला व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये विराट आणि बाबर सर्वोत्तम कामगिरी करताना दिसते. दोघेही आपल्या संघाला विजय मिळवून देण्याच्या इराद्याने दुबईच्या मैदानात उतरतील.
सामन्यापूर्वी बाबर आणि कोहली यांच्यावर भाष्य करताना इंझमाम म्हणाले की, बाबर आझमला करियरमधील सर्वोच्च शिखरावर पोहचण्यासाठी अजून वेळ आहे. कोणताही फलंदाज तिशीच्या घरात विशेष उंची गाठतो. बाबरमध्ये ती क्षमता आहे. ते पुढे म्हणाले की, भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंवर दबाव असतो. या सामन्यात बाबर आझमपेक्षा विराट कोहलीवर अधिक दबाव असेल. विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. एवढेच नाही तर आयसीसीच्या स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अपयशी ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बाबरपेक्षा त्याच्यावर निश्चित अधिक दबाव असेल, असे मत इंझमाम यांनी व्यक्त केले.
बाबर हा धावांसाठी भुकेला दिसतो. त्याची खेळण्याची शैली कमालीची आहे. तो असेच खेळत राहिला तर अनेक विक्रम आपल्या नावे करण्याची बाबरला उत्तम संधी आहे, असेही इंझमाम यांनी म्हटले आहे. बाबर आझम टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद रिझवानच्या साथीने डावाला सुरुवात करेल. तो कशी कामगिरी करतोय यावर सर्वांच्या नजरा असतील.
बाबर आझम सातत्याने चांगली कामगिरी करुन दाखवत विराटला टक्कर देताना दिसते. त्यामुळेच त्याची विराटसोबत तुलनाही केली जाते. भारत-पाक सामन्यात दोघांच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील. दोघात कोण भारी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.