IND vs SCO: म्हणून मी सर्वात जास्त आनंदी- 'बर्थ-डे बॉय' विराट
टीम इंडियाच्या धडाकेबाज विजयानंतर विराट कोहलीची सूचक प्रतिक्रिया
India vs Scotland, T20 World Cup: भारतीय संघाने तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंड संघाचा अक्षरश: धुव्वा उडवला. भारतीय गोलंदाजांनी आधी स्कॉटलंडच्या संघाला अवघ्या ८५ धावांत गुंडाळलं आणि त्यानंतर ८६ धावांचं आव्हान फक्त ६.३ षटकांत पार केलं. रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीने भारताकडून सर्वाधिक ३-३ बळी टिपले. तर लोकेश राहुलने १८ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक ठोकलं. या विजयानंतर बर्थ डे बॉय विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
"म्हणून मी आनंदी आहे..."
"संपूर्ण सामन्यावर आचं वर्चस्व होतं. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होतो. आजच्या सामन्यात काय घडलं याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण आमचा संघ कसा खेळू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. नाणेफेक, खेळपट्टी या गोष्टी टी२० क्रिकेटमध्ये निर्णायक ठरतात हे मला माहिती आहे. पण आमचे सारे खेळाडू आता लयीत आलेत हे पाहून मी सर्वात जास्त आनंदी आहे", अशा भावना बर्थ डे बॉय विराट कोहलीने व्यक्त केल्या.
आजचा प्लॅन काय होता? कोहली म्हणतो...
"आजच्या सामन्यात स्कॉटलंडला १०० त १२० धावांपर्यंतच मजल मारू द्यायची असा आमचा प्लॅन होता. कारण आम्हाला सामना ८ ते १० षटकांत जिंकायचा होता. १३०-१४० धावांचे आव्हान आले असते तर सारं काही फिसकटलं असतं. आम्ही आमच्या खेळाडूंना त्यांच्या पद्धतीने खेळण्याची संधी दिली आणि त्याचा परिणाम आपल्या साऱ्यांच्या समोर आहे", असं किंग कोहली म्हणाला.
दमदार कमबॅकचा गुरूमंत्र काय?
"आम्ही मैदानात उतरलो त्याआधी आम्ही ही स्पर्धा दोन टप्प्यात विभागून टाकली. पहिल्या दोन सामन्यात आम्ही फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. त्या दोन सामन्यांना बाजूला ठेवलं आणि सगळ्यांना सांगितलं की केवळ दोन षटकंदेखील अख्खी स्पर्धा बदलू शकतात. त्यामुळे साऱ्यांना स्फुरण चढलं आणि सांघिक कामगिरीत प्रचंड सुधारणा झाली", असं त्याने सांगितलं.
वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं करणार?
"वाढदिवसाचं सेलिब्रेशन वगैरे या गोष्टींच्या मी आता पलिकडे पोहोचलो आहे. माझी पत्नी अनुष्का आणि मुलगी माझ्यासोबत इथे आहे. तुमचं कुटुंब तुमच्यासोबत वाढदिवशी असणं हीच खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असते. माझ्यासाठी ते गिफ्ट पुरेसं आहे", अशा शब्दात किंग कोहलीने छान उत्तर दिलं.
दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आज नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी विराटचा निर्णय सार्थ ठरवला. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी दोघांनी ३-३ बळी घेत स्कॉटलंडला ८५ धावांत गुंडाळलं. त्यानंतर रोहित शर्मा (१६ चेंडूत ३० धावा) आणि लोकेश राहुल (१९ चेंडूत ५० धावा) या दोघांनी तुफान फटकेबाजी करत संघाला ६.३ षटकात सामना जिंकवून दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.