नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीनंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा कधी आंतरराष्ट्रीय सामना खेळणार याची प्रतीक्षा मार्चमध्ये संपण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये तो आशिया संघातून शेष विश्व संघाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 सामने खेळण्याची दाट शक्यता आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळाने 18 आणि 21 मार्चला आशिया संघ वि. शेष विश्व संघ यांच्यात दोन ट्वेंटी-20 लढती घेतल्या आहेत. त्या सामन्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आंतरराष्ट्रीय लढतींचा दर्जा दिला आहे. आशिया संघातून खेळण्याची महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांना मंजुरी द्यावी, अशी विनंती बांगलादेश क्रिकेट मंडळाने भारतीय मंडळास केली असल्याचे समजते.
बांगलादेशातील दोन ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय लढतीत खेळण्याची परवानगी खेळाडूंना द्यावी ही विनंती आम्ही भारतीय मंडळ तसेच आशियातील अन्य संघांना केली आहे, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे कार्यकारी संचालक निझामुद्दीन चौधरी यांनी सांगितले आहे. आता भारतीय मंडळ कदाचित कसोटी, एकदिवसीय तसेच ट्वेंटी-20 संघात नियमित असलेल्या खेळाडूंना मंजुरी देण्याची शक्यता कमी आहे; पण धोनीसारख्या केवळ मर्यादित षटकांच्या लढतीसाठीच उपलब्ध असलेल्या खेळाडूंना मंजुरी मिळू शकेल असे सांगितले जात आहे.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपले होते. ही लढत जुलैत झाली होती. त्यानंतरच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेच्यावेळी धोनीने माघार घेतली. आपल्याला लष्कराबरोबर प्रशिक्षण घ्यायचे असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, त्यानंतर तो दक्षिण आफ्रिका तसेच बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या लढतीत खेळला नाही. आता त्याची विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड झालेली नाही. विंडिजविरुद्धच्या संघनिवडीपूर्वी धोनीने रांचीत सराव सुरू केल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते.
|