Ind vs Ban 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला! पंत अन् अय्यरमुळे भारताकडे 80 धावांची आघाडी

India vs Bangladesh 2nd Test Day 2 live score
India vs Bangladesh 2nd Test Day 2 live scoreesakal

India vs Bangladesh 2nd Test Day 2 live score : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशने एकही विकेट न गमावता सात धावा केल्या. भारताकडे 80 धावांची आघाडी आहे.म इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली.

भारताने दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव बिनबाद 19 धावांपासून पुढे सुरू केला. मात्र बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लामने आधी केएल राहुलला 10 धावांवर त्यानंतर शुभमन गिलला 20 धावांवर पायचीत बाद करत भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिला सेशन खेळून काढण्याच्या इराद्याने भागादारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भारताला 73 धावांवर पोहचवले असतानाच तैजुलने ही जोडी फोडली. त्याने पुजाराला 24 धावांवर बाद केले.

यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. मात्र दोन्ही खेळाडूंचे शतक हुकले. पंतने 105 चेंडूत 93 तर अय्यरने 105 चेंडूत 87 धावा केल्या. या दोघांनी भारताची धावसंख्या 94/4 वरून 253/5 पर्यंत नेली. मात्र, पंत बाद होताच भारताचा डाव गडगडला. भारताने शेवटच्या सहा विकेट 62 धावांत गमावल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. तस्किन अहमद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारताने पहिल्या डावात केल्या 314 धावा

भारताने पहिल्या डावात 314 धावा केल्या आहेत. शाकिब अल हसनने सिराजला नुरुल हसनच्या हाती यष्टिचित करून भारताचा डाव संपवला. सिराजने 15 चेंडूत सात धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताने 87 धावांची आघाडी घेतली आहे.

ऋषभ पंतचे 7 धावांनी हुकले शतक

253 धावांच्या स्कोअरवर भारताची पाचवी विकेट पडली आहे. ऋषभ पंत 105 चेंडूत 93 धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि पाच षटकार मारले. पंतने श्रेयससोबत 159 धावांची भागीदारी केली. आता अक्षर पटेल श्रेयस अय्यरसोबत क्रीझवर आहे.

अय्यरचेही अर्धशतक, भारत आघाडीवर 

ऋषभ पंत पाठोपाठ श्रेयस अय्यरनेही अर्धशतकी खेळी करत बांगलादेशचे पहिल्या डावातील 227 ही धावसंख्या पार केली.

पंत - अय्यरची शतकी भागीदारी

भारताची अवस्था 4 बाद 94 धावा अशी झाली असताना ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या जोडीने बांगलादेशवर काऊंटर अटॅक करत शतकी भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर भारत 200 च्या जवळ पोहचला आहे.

पंतचे आक्रमक अर्धशतक

लंचनंतर विराट कोहली 24 धावा करून बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने श्रेयस अय्यच्या साथीने आक्रमक फलंदाजी करत भारताला 150 चा टप्पा पार करून दिला. याचबरोबर आपले अर्धशतक देखील 48 चेंडूत पूर्ण केले.

IND 94/4 (37.4) : टस्किनने दिला मोठा धक्का

लंचनंतर टस्किन अहमदने भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. त्याने भारताची रनमशिन विराट कोहलीला 24 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला.

लंच टाईम 

भारताने उपहारापर्यंत 3 बाद 86 धावांपर्यंत मजल मारली. खेळ थांबला त्यावेळी विराट कोहली 18 तर ऋषभ पंत 12 धावा करून नाबाद होते.

टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का!

72 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. चेतेश्वर पुजारा 55 चेंडूत 24 धावा करून बाद झाला आहे.

तैजुल इस्लामनेच भारताला दिला दुसरा धक्का

तैजुल इस्लामनेच भारताला दुसरा धक्का दिला आहे. त्याने शुभमन गिलला एलबीडब्ल्यू आऊट केले. गिलने 39 चेंडूत 20 धावा केल्या. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. आता विराट कोहली पुजारासह क्रीजवर आहे. भारताची धावसंख्या 17 षटकांनंतर 2 बाद 47 अशी आहे.

 भारताला पहिला धक्का! 10 धावा करून कर्णधार राहुल तंबूत...

27 धावांवर भारताची पहिली विकेट पडली आहे. कर्णधार लोकेश राहुल 45 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.

सामन्याच्या पहिल्या दिवशी काय झाल?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने चांगली सुरुवात केली आणि नझमुल हसन आणि झाकीर यांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. 12 वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटने भारताला पहिले यश मिळवून दिले. तीन चेंडूंनंतर अश्विनने शांतोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मोमिनुल आणि कर्णधार शकीबने तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. उमेशने शाकिबला बाद करून ही भागीदारी तोडली. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला.

मोमिनुल एका टोकाला उभा होता, पण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. मोमिनुलने अनेक फलंदाजांसोबत 40 हून अधिक धावांची भागीदारी केली, मात्र अर्धशतकी भागीदारी करू शकला नाही. बांगलादेशकडून मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. भारताकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. त्याचवेळी जयदेव उनाडकटने दोन गडी बाद केले. अखेर बांगलादेशचा संघ 227 धावांवर बाद झाला.

प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात आठ षटकांत एकही गडी न गमावता 19 धावा केल्या. राहुल 3 आणि शुभमन गिल 14 धावा करत खेळत आहे. भारत बांगलादेशच्या स्कोअरपेक्षा 208 धावांनी मागे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com